आणखी काही वेळ तो तसाच विचार करत बसला होता. डायरीमध्ये आणखी तीन पानं वाचायची राहिली होती पण एक तर हे हिंदीत वाचणंसुद्धा थोडं वेळखाऊच होतं. मराठी किंवा इंग्लिश आपण जसं झरझर वाचून काढतो, तसं नव्हतं हे… आणि आता डोक्यातल्या सगळ्या विचारांमुळे, जागरणामुळे त्याचे डोळे अक्षरशः मिटायला लागले होते…..त्याने तसंच स्वतःला पलंगावर झोकून दिलं आणि पुढच्या दोनच मिनिटात त्याला गाढ झोपही लागली. झोप लागण्यापूर्वी मात्र त्याने पलंगावर पडल्या पडल्याच त्या कपाटाकडे नजर टाकली….आणि मग मग कुठल्याही भीतीने पुन्हा मनात शिरकाव करण्याआधी त्याकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर वळून डोक्यावरून पांघरूण घेऊन तो गाढ झोपून गेला …
************************* भाग ३७ पासून पुढे ***************************
भाग ३७ येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-VG
“अरे बापरे, म्हणजे तू सगळ्या बाजूने पेचात सापडलायस….पण तू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलास? आय मिन, कोणीतरी समजूतदार असेल त्यांच्यात….तू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास का?”
सु.सा.ने एकवार घड्याळाकडे नजर टाकत म्हटलं…ह्या गौरवची म्हणजे सुजयची गोष्ट इतकी इंटरेस्टिंग होती की ती ऐकताना जवळपास दोन तास निघून गेले होते तरीही त्याला भुकेची जाणीव झाली नव्हती…..
“अरे समजावण्यासारखी माणसं नाहीत रे ती….मी कसाबसा वाचलो त्यांच्या तावडीतून हे माझं नशीब….आता तू तरी माझ्यावर विश्वास का ठेवशील? मी जे सांगतोय तेच चित्र तुला दिसतंय….पण ट्रस्ट मी मित्रा….एवढंच सांगू शकतो मी…तू मला जे काही थोडंफार ओळखतोयस आणि तुझं मन तुला माझ्यावर विश्वास ठेवायला सांगतंय का ह्या गोष्टींचा विचार कर आणि तू निर्णय घे मला मदत करता येईल की नाही ह्याचा….
खरंच हे सगळं होऊन गेल्यापासून मी इतका धास्तावलेलो असतो…मी आणि माझी आई ह्याच्यापुढे आता कसलाच विचार करायचा नाही हे ठरवून टाकलंय मी…..मित्रांबरोबरच्या ट्रिप्स, फिरायला जाणं सगळं सगळं हळू हळू कमी केलं नंतर…खरं तर ते झालं…माझंच लक्ष उडालं सगळ्यातून…किती दिवस तर मी बाहेर पडायलासुद्धा घाबरायचो….कोणी माझ्या पाळतीवर तर नसेल ना…हाच विचार सारखा डोक्यात….ह्या सगळ्यात लग्नाचा विचार कसा करणार सांग…म्हणजे माझी इच्छा आहे लग्न करण्याची…..सगळ्या मित्रांची लग्न झाली आहेत आता सो मला पण वाटतं माझं लग्न व्हावं…पुढच्या प्रवासात कोणाचीतरी साथ असावी…पण ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मुळे मी धास्तावलोय…लग्नाचा विचार आणखी चार–पाच वर्ष तरी पुढे ढकलुया असा मी विचार केला होता….पण प्रश्न असा आहे की आईला आणि काका– काकूंना काय सांगू? त्यांना ह्यातलं काहीच माहित नाही अरे…मी ज्या टेन्शन मधून जातोय गेलं दीड वर्ष ते त्यांच्यापर्यंत कशाला जाऊ द्यायचं? पण म्हणूनच ते मागे लागलेत लग्नासाठी…आईला थोपवणं तर दिवसेंदिवस कठीण होतंय अरे…..”
त्याचं बोलणं ऐकता–ऐकताच पाणी पिण्यासाठी म्हणून सु.सा.उठला आणि त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून म्हणाला,
“आय कंप्लिटली अंडरस्टॅंड युअर सिच्युएशन फ्रेंड. पण तरी तू म्हणतोयस त्याने काय साध्य होणार आहे ते मला कळत नाहीये….आणि त्यासाठी हे असं सगळं करणं..मला ठीक नाही वाटत….सॉरी म्हणजे तू मदत मागायला आलायस पण ही अशी मदत ……………मला कळत नाहीये….”
“तुझ्या परीने तू शंभर टक्के बरोबरच आहेस. आणि खरं तर आपल्यासारख्या साध्या, सरळ घरातल्या मुलांना हा असा विचार करणंही चूक वाटेल आणि ते आहेच. पण तरी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नंतर तुझं ऑफिसचं आय.कार्ड मिळालं, त्याच्यावरचं तुझं नाव वाचलं तेव्हाच मनात कुठेतरी आशा निर्माण झाली होती. असं वाटलं की देवाने माझ्या मदतीसाठीच पाठवलं आहे तुला. म्हणूनच माझं खरं नाव सांगावंसं वाटलं नाही तेव्हा. पण तुला असं गृहीत कसं धरणार मी ? दीड महिना आईजवळ होतो तेव्हा तिच्याकडे बोलायला ‘माझं लग्न‘ ह्याशिवाय दुसरा विषय नव्हता अरे. तिला काही ना काही कारणं देताना माझ्या नाकी नऊ आले. मी इथे यायला निघालो तेव्हा म्हणाली, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा असं वाटत असेल तर लग्न कर, लवकरात लवकर. तेव्हाच मनात पक्कं ठरवलं, आता आऊट ऑफ द वे जाऊनच काहीतरी प्रयत्न करायला लागणार. इथे येऊन मी सगळा विचार केला. आणि ठरवलं की तू मदत करायची ठरवलीस तर हे साध्य होण्यासारखं आहे. “
“मला तुझ्यावरचं प्रेशर कळतंय अरे. पण मी परत तेच विचारतोय, एवढा डेस्परेट का होतोयस तू? म्हणजे एकदम असं पाऊल का उचलतोयस? लग्नासाठी जसं नॉर्मली स्थळं बघतात तसं करून तर बघ…काहीतरी निगेटिव्हच होईल असं का मनात आणतोयस आधीपासूनच…?”
“कारण तसं झालंय आधी सुजय, दोन वेळा….मध्य प्रदेशातल्या त्या ट्रिपनंतर आईला माझ्यात झालेला बदल जाणवत होता आणि म्हणूनच तिने माझ्या लग्नासाठी बघायला सुरुवात केली, अर्थात माझ्या परवानगीनेच. दोन वेळा माझं लग्न ठरलंसुद्धा. पण नंतर कसं कोण जाणे मुलीकडच्यांना ते पोलीस स्टेंशनमध्ये केलेल्या कम्प्लेंटबद्दल कळलं. नशीब दोन्ही वेळेला ‘आम्ही हे लग्न करू शकत नाही‘ असं सांगायला त्यांचे फोन आले तेव्हा आई बाहेर गेली होती. मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही झाला. आई नंतर फोन करून त्यांच्याशी बोलणार होती पण मीच तिला फोन करू दिला नाही, तिला लग्न मोडण्याचं दुसरंच काही कारण सांगितलं. तिला हे सगळं कळू द्यायचं नाही मला. तर त्यामुळे तिला हा अंदाजच नाहीये की आता पुन्हा लग्न ठरलं तर ते ह्याच कारणाने मोडू शकतं. अशाने माझं लग्न कर कधीच होणार नाही, पण तिला आणि मला प्रचंड मनस्ताप होईल फक्त. हे सगळं टाळायला मी हा विचार केला….”
“अरे पण म्हणून असं….खोटं बोलून? हे असं करण्यापेक्षा सरळ बोलायचं ना त्या मुलीशी किंवा तिच्या घरच्यांशी…जे झालंय ते त्यांना मोकळेपणाने सांगायचं….ह्यात रिस्क कमी आहे, नाही का?”
“तुला खरंच असं वाटतं ह्यात रिस्क कमी आहे असं? ह्यात एकच रिस्क आहे, ती म्हणजे माझं लग्न कधीही न होण्याची आणि माझ्याबद्दल हे जे कळलंय ते हळूहळू जगजाहीर होण्याची….मला सांग, अरेंज्ड मॅरेजमध्ये कोणते आई–वडील अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावून देतील ज्याच्या नावावर पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे? खरं–खोटं करायलासुद्धा कोणी जाणार नाही…कशाला ह्या वाटेला तरी जायचं म्हणून आधीच नकार कळवतील…”
थोडं थांबून सु.सा.च्या मनात चाललेल्या विचारांचा अंदाज घेत गौरव उर्फ सुजय म्हणाला,
” हे बघ, मला काही असा विचार करताना आनंद होत नाहीये. मी पण तुझ्यासारखाच चांगल्या घरातला मुलगा आहे. पण माझ्यापुढचे सगळे पर्याय संपलेत आता….मी कुणाचं वाईट करण्याच्या हेतूने तर काही करत नाहीये ….मुद्दाम फसवत नाहीये कोणाला ….मला सांग, आपल्या दोघांमध्ये दिसणं सोडलं तर बाकी मेजर फरक काय आहेत? घरची परिस्थिती, शिक्षण, इन्कम, संस्कार…सगळ्या बाबतीत आपण सारखे आहोत….माझा मुंबईतला फ्लॅट पण रेडी होतोय पुढच्या २–३ महिन्यात…आणि लग्नासाठी मुलींना भेटताना तर मी तुला पुढे करत नाहीये ना, प्रत्यक्ष भेटणार, बोलणार तर मीच आहे …मी फक्त तुझी ओळख वापरतोय म्हणजे लोकांनी माझी माहिती काढण्याचा प्रयत्न केलाच तरीही माझ्याबद्दलचं काही त्यांना कळणार नाही, किंवा कळलं असेल तरी ते कन्फर्म करायला गेले तर ती माहिती मॅच होणार नाही… “
बोलणं थांबवून त्याने सु.सा. कडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आणि हे सगळं बोलणं न पटल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याला आणखी काहीतरी बोलून कन्व्हिन्स करणं भाग होतं. गौरव (सुजय) त्याच्यापाशी आला.
“सुजय……”
पण सु.सा.आपल्याच विचारात होता.
“सुजय …..”
यावेळी त्याने जरा मोठ्याने हाक मारली..
“हा…काय?” एकदम आपल्या विचारातून बाहेर येत सु.सा.म्हणाला,
“अरे एवढं टेन्शन घेऊ नकोस मित्रा….हे बघ, माझं टेन्शन तुझ्यावर ढकलायचं नाहीये मला….मी समजू शकतो तू एवढं विचारात पडलायस त्यामागचं कारण…..ह्या मुलाला काय समजलो होतो आणि हा कसा निघाला, असंच काहीतरी वाटत असेल ना तुला? ”
ह्यावर सु.सा.काहीतरी बोलायला जाणार होता पण त्याला काहीच बोलू न देता गौरव (सुजय) पुढे म्हणाला,
“वाटत असणारच. आणि अगदीच साहजिक आहे ते….तुझ्याजागी मी असतो तर मलासुद्धा हा सगळा प्रकार फार विचित्र वाटला असता. तुला वाटत असेल माझ्या डोक्यात हे असलं काहीतरी शिजतंय म्हणजे मी अगदी सराईतपणे असा खोटं वागत असेन, किंवा मला हा सगळा असा विचार करताना मनात काहीच गिल्ट नसेल, पण ट्रस्ट मी ….मागच्या दीड वर्षात इतक्या वेगवेगळ्या आणि तितक्याच विचित्र अनुभवातून गेलोय मी…मला वाटलं होतं थोडा वेळ जाऊ दिला की सगळं ठीक होईल…पण असं होईल असं चित्र दिसत नाहीये…उलट दोन वेळा लग्न मोडलं तेव्हा लक्षात आलं, ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या भविष्यावर होणार, माझं लग्नच कधी होऊ शकणार नाही, माझी आई माझ्या लग्नाची वाट बघत आणखी म्हातारी होणार, खचणार….आणि माझ्या आयुष्यावर त्या सगळ्या गोष्टींचा असा परिणाम झालेला मला खरंच नकोय….काहीच पर्याय राहिला नाही ना समोर, की मग आपण हातपाय मारत धडपड करायला लागतो आपल्याला हवं ते करण्याची…माझं तसंच झालं….हे सगळं करण्याचा विचार मी करतोय कारण समोर असलेला कुठलाच पर्याय माझ्या उपयोगी पडणार नाहीये हे माझ्या लक्षात आलंय…”
“ठीक आहे…तुझा हा विचार करण्यामागचं कारण मला कळलंय….पटलंय असं मी नाही म्हणणार. पण तरी तुझ्याबाजूने तू बरोबर असशील असं धरलं तरी अरे हे प्रॅक्टिकल आहे, असं वाटतंय का तुला? तुला असं वाटतंय का, की मुलीला तू माझी माहिती पाठवलीस आणि तू भेटायला गेलास तरी नंतर त्यांना कळू शकणार नाही ?….अरे एक काय हजार मार्ग आहेत कळण्याचे…लग्न ठरलं तरी ते होईपर्यंत आपण शंभर वेळा भेटतो एकमेकांना, आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना….तुझी खरी माहिती, तुझ्या घरचे, तुझा जॉब सगळंच वेगळं आहे हे कळायला किती वेळ लागणार आहे त्यांना? आणि आणखी थोड्या वेगळ्या बाजूने विचार कर ना, त्यांना जर हे असं कळलं तर ते पोलीस कंप्लेटसुद्धा करू शकतील फसवणूक केली म्हणून. आणि तुझ्या आईला हे सगळं कळेल तेव्हा? त्यांना आवडणार आहे का हे? पुन्हा हे एवढं सगळं करून तू लग्न केलंस तर नंतर तरी त्या मुलीला कळणारच ना? हा एवढा सगळा विचार केला आहेस का ? हे सगळं कसं काय हॅण्डल करणार आहेस? “
“अर्थात. …मला अंदाज आहे त्या सगळ्याचा….कसं आहे माहित आहे का? आत्तापर्यंतच्या माझ्या करिअर मध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे…आपण रिस्क घेतली की त्याचे रिटर्न्ससुद्धा तसेच मिळतात….आणि एकदा रिस्क घेऊन, निर्णय घेऊन आपण पुढे त्या वाटेवर चालायला लागलो ना की अशा कितीतरी रीस्क्स असतात मध्ये पण मग आपण सुरुवातीलाच निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे ह्या मध्ये येणाऱ्या अडचणींवर आपोआप सोल्युशन मिळत जातं अरे….खरं तर आपणच ते शोधतो…जे बिझनेस आणि करियरच्या बाबतीत, तेच लाईफबद्दल सुद्धा लागू होतं, नाही का? तुझ्या डोक्यात जे प्रश्न आहेत ते माझ्याही डोक्यात आहेत, पण मी आत्ता त्याचा विचार करत नाहीये…कारण योग्य वेळी मी त्याचा विचार करणार आणि तेव्हा त्यावरचं सोलुशनपण मला मिळणार, आय एम शुअर अबाऊट इट…आणि….फार तर फार काय होईल, पोलीस कम्प्लेंट होईल आणि मला अरेस्ट होईल,…..पण मला सांग, हे असं सगळ्या बाजूंनी संकटात सापडून मग तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहण्यापेक्षा सरळ मला हवंय त्यासाठी माझ्याकडे जे ऑब्शन्स आहेत ते वापरून मी प्रयत्न केला तर ते बेटर नाही का? मार्ग चुकीचा असेल, पण हेतू नक्कीच नाही….मी वाईट नाही हे माझं मला माहित आहे ना, मग झालं तर…… आणि निदान मी प्रयत्न केला हे तरी समाधान राहील माझ्याकडे, नाही का?”
त्याचं हे बोलणं ऐकून सु.सा.गप्पच बसला. त्याला हे सगळं पटलं होतं असं नाही, म्हणजे तो स्वतः हा असला जगावेगळा विचार कधीच करू शकला नसता. आणि म्हणूनच त्याला ह्या गौरव म्हणजेच सुजयचं कौतुक वाटायला लागलं होतं….एखादी चुकीची कृती करताना केवळ आपल्या स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून ह्यातून पुढे चांगलंच होईल अशी स्वतःलाच खात्री देऊन एवढं मोठं पाऊल उचलणं आणि त्याची सगळी जबाबदारी घेणं, ही खूप मोठी गोष्ट होती….आपण हे असं कधीच करू नाही शकणार, त्याच्या मनात आलं. कुठलाही मोठा निर्णय घेताना घरी आई–बाबांशी सल्ला–मसलत करून मगच पुढे पाऊल टाकायचं, अशीच सवय झाली होती त्याला….आज ह्या गौरववर आली आहे तशी वेळ आपल्यावर आली असती तर काय केलं असतं आपण? आपण घरी येऊन आई–बाबांना सगळं नक्कीच सांगितलं असतं….पण त्याचा बिचाऱ्याचा तोसुद्धा प्रॉब्लेम झाला असेल, घरी एकटी आईच…तिला मनस्ताप होईल, टेन्शन येईल म्हणून त्याला तिला खरं काही सांगता येत नाही, हे अगदीच पटण्यासारखं आहे….
“चल, मी निघतो. तुझा खूपच वेळ घेतला…” अचानक उठत गौरव (सुजय) म्हणाला.
“अरे असा काय एकदम निघालास? आपलं बोलणं अर्धवट राहिलं….” सु.सा.
“अर्धवट नाही राहिलं अरे…माझं बोलणं, माझी बाजू सांगून झाली तुला….आणि खरं सांगू का? तुला प्रेशराईझ नाही करायचंय मला…आणि मी तुला त्या दिवशी मदत केली म्हणून तू पण मला मदत करावीस, असं पण अजिबात नाही…”
“मी असं काहीच नाही म्हटलं अरे…”
सु.सा.ला आता काय बोलावं हे कळेना….त्याचा जीव वाचवून ह्या सुजयने त्याच्यावर अनंत उपकार केले होते….त्याची बाजू पटली नसली तरी त्याच्या हेतूविषयी, खरेपणाविषयी त्याला कोणतीही शंका नव्हती….पण तरी त्याला अशी मदत कशी करायची? हा एक प्रकारचा गुन्हाच होता की….पण तरी…काय करावं?
त्याचं एक मन त्याला सांगत होतं, त्याने जीवावरच्या संकटातून तुला बाहेर काढलंय, बाकी कोणी मदतीसाठी नसताना तो धावून आला आणि आऊट ऑफ द वे जाऊन मदत केली तुला, त्याला आता आपली मदत होणार असेल तर थोडंसं खोटं बोलायला काय हरकत आहे? आणि तसंही आपल्याला काहीच करायचं नाहीये, फक्त आपली ओळख त्याला वापरू द्यायची आहे….काय हरकत आहे? त्याचा चांगुलपणा आपण स्वतः अनुभवलाय….आपल्यामुळे एका चांगल्या मुलाचं आयुष्य मार्गी लागणार असेल तर काय हरकत आहे?
पण त्याचं पापभिरू मन मात्र त्याला हे चूक आहे, ह्यात पडू नकोस असं बजावत होतं.
“निघतो सुजय…भेटू पुन्हा कधीतरी….” तो दरवाजापर्यंत पोहोचलासुद्धा..
“गौरव….आय मिन, सुजय…..जरा थांब….मी मदत करायला तयार आहे तुला…”
“काय? तू खरं बोलतोयस का? नीट विचार कर सुजय आणि प्लिज कोणत्याही दडपणाखाली येऊ नकोस…”
“तसं काही नाहीये…डोन्ट वरी….फक्त मला ह्यात डायरेक्ट्ली पडायचं नाहीये…मी कोणाच्या समोर नाही येणार ना?”
“अजिबात नाही….आणि इन केस पुढे मागे काही प्रॉब्लेम झालाच तरी तुला ह्यातून वेगळा ठेवेन मी,…ट्रस्ट मी ऑन दॅट…तुझ्या परवानगीशिवाय तुझी ओळख मी वापरली असं सांगेन मी…तुला ह्यातलं काहीच माहित नव्हतं, असं…..पण एक मिनिट, त्याआधी, तुझी पूर्ण खात्री होण्यासाठी एक नंबर देतो तुला, त्या पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध कम्प्लेंट नोंदवलेली आहे, तिथल्या पोलीस ऑफिसरचा नंबर आहे…मिस्टर नायक म्हणून …हा बघ…तुझ्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेव…त्यांना फोन करून तू कन्फर्म करू शकतोस सगळं….आणि मग उद्या मला कळव तुझा डिसिजन…ओके? तू मला साथ द्यायला तयार आहेस हे बघूनच खूप धीर आलाय मला….तुझ्या फोनची वाट बघतोय …चल बाय….”
सु.सा. ने नंबर कॉपी करून घेतल्यावर गौरव (सुजय) एक मिनिटही थांबला नाही….लगेच त्याला पुन्हा बाय करून तो निघून गेला…..
—————————————————————-
मागचं हे सगळं आठवताना आज सु.सा.ची झोपच उडाली होती. या कुशीवरून त्या कुशीवर होताना त्याला स्वतःच्या अस्वस्थपणाची जाणीव झाली….त्या दिवशी सुजयला मदत करण्याचं प्रॉमिस केलं, नंतर तो बाहेर पडून १० मिनिट्स झाले नसतील तेवढ्यात त्या इन्स्पेक्टरला फोन करून सुजय खरं सांगत असल्याची खात्री करून घेतली आणि मग त्याने मनाशी पक्का निर्णय घेतला…सुजयला मदत करण्याचा….त्यावेळेपासून आजपर्यंत त्याला असं काहीतरी चुकत असल्याची, अपराधीपणाची भावना कधीच डोक्यात आली नाही….तो मध्ये मध्ये सुजयला सांगत राहिला की जाऊदे हा मार्ग नको, खरं काय ते सांगून टाक सायलीला…पण तरी तेव्हासुद्धा त्याला मदत करून आपण काही चूक केली आहे असं त्याला कधीच वाटलं नाही…पण मग आज …आज असं काय झालं होतं? आई–बाबा येणार म्हटल्यावर त्याच्या मनात ह्या सगळ्याबद्दल एक विचित्र अशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती…..
आपण सुजयला तेव्हाच ‘नाही‘ म्हणायला हवं होतं…आता त्याचं मन त्याला सांगत होतं….पण आता काय उपयोग होता? आता सगळं घडून गेलं होतं….’मी ह्यात कोणाच्या समोर येणार नाही, एवढं बघ‘ असं म्हणून सुद्धा त्या दिवशी सायली अचानक घरी आल्यामुळे तो अनपेक्षितपणे तिच्या समोर आला होता….तिला त्याचं खरं नाव, खरी ओळख माहित नव्हती पण उद्या पुढे मागे जर हे तिला कळलं तर तिला हे सुद्धा कळणार होतं की त्या दिवशी मी स्वतः माझी खोटी ओळख करून दिली होती….हे सगळे विचार मनात यायला लागले तसा तो अस्वस्थ व्हायला लागला…..आई–बाबा आल्यावर त्यांना सामोरं कसं जायचं हा प्रश्न त्याच्या डोक्यात सुरु झाला….
ज्यावेळी त्याने भाबडेपणाने सुजयला पुढच्या प्रवासात मदत करण्याची तयारी दर्शवली, त्या पुढच्या प्रवासाची तयारी सुजयने आधीच करून ठेवली होती हे त्याला आजपर्यंत माहित नव्हतं….
—————————————————————————
ज्यावेळी सु.सा.त्या इन्स्पेक्टरशी फोनवर बोलून सुजयच्या बोलण्यातल्या खरेपणाविषयी जाणून घेत होता, त्याच वेळेला सुजय त्याच्याच बिल्डिंगमधल्या पार्कजवळ थांबला होता…त्याच्या मोबाईलमधल्या स्क्रीनवर त्या मॅरेज ब्युरो मधल्या प्रोफाईलमधून घेतलेला सायलीचा फोटो होता…आज रात्रीच येईल ह्याचा फोन, वर सुजयच्या फ्लॅटच्या दिशेने पाहत तो मनात विचार करत होता….मी इन्स्पेक्टरशी बोललो आणि तुला मदत करणार आहे असा…आता सगळं मला हवं तसं होईल… मला खात्री आहे ह्याची ओळख, ह्याचं नाव जादू करणारच….आता थोडेच दिवस सायली….तुझ्या अपेक्षा आणि ह्याचं प्रोफाईल परफेक्ट मॅच होतंय…तुला भेटायला आता हा सुजय साने येतोच आहे….
———————————————————————————–
———————————————————————————-
“सायले, झोप लागली का ग रात्री…..?”
जाग आल्या आल्याचं ईशाने डोळे चोळत सायलीला विचारलं. पण सायली कशात तरी डोकं घालून बसली होती, म्हणजे काहीतरी वाचत होती…तिचं लक्षच नव्हतं.
“सायले…ए बाई ….ए सायली….”
दोन वेळा हाक मारूनही सायलीचं लक्ष गेलं नाही, तशी ईशा उठून बसली आणि सायलीच्या डोळ्यापुढे हात नाचवत म्हणाली,
“मॅडम, मी ईशा….मी कधीपासून हाक मारतेय आपल्याला….आपण ह्याच जगात आहात ना आणि रात्रभरात मला पामराला विसरून तर गेला नाहीत ना?”
“गप गं ईशा, ….काय उठल्या उठल्या टाईमपास करतेयस? जा आवरून ये आधी….” सायलीने पुन्हा त्या कसल्याशा पेपर्स मध्ये डोकं घातलं.
“ए…टाईमपास काय? मी विचारलं झोप लागली का रात्री? झोपताना तुलापण टेन्शन आलं होतं ना, तो सुजय भेटला काल पुण्याहून येताना, म्हणजे ‘ती‘ येणार रात्री असं वाटलं होतं आपल्याला…..”
तिचं बोलणं ऐकून सायलीने वाचनातून डोकं बाहेर काढलं.
“हो गं ईशी, आय मिन, माई आजी म्हणाली खरी की काही होत नाही, झोपा….पण अशी कशी झोप लागणार? मी जागीच होते थोडा वेळ…असं वाटत होतं आता कुठल्याही क्षणी ‘ती‘ची चाहूल लागेल….पण असं काहीच नाही झालं गं…मला मग कधी झोप लागली ते कळलंच नाही…सकाळी मोबाईल मधला अलार्म वाजला तेव्हा जाग आली….पण ईशा, या वेळी असं कसं झालं गं? सुजय भेटला तरी ‘ती‘ आलीच नाही….”
“बरं झालं ना मग? तुला काय ती यायला हवी होती का?”
“अगं तसं नाही गं…ती आली नाही ते बरंच झालं..पण मी विचार करतेय तो जरा वेगळाच…बघ हा, म्हणजे ती जर आपल्याला सावध करायला किंवा काहीतरी सांगायला किंवा अगदी आपल्याला काही ईजा करायला येत असेल तरी मग आता या वेळी ती आली नाही, म्हणजे या पैकी तिचा जो काही मोटिव्ह आहे, तो पूर्ण झालाय म्हणून ? की आणखी काही कारण असेल?”
“हम्म …पॉईंट आहे….” ईशा विचार करत म्हणाली..
“बरं ते जाऊदेत ईशा, तू जा ना पटकन आवरून ये…मला तुला अजून काहीतरी दाखवायचंय…” सायली
“काय ?” ईशा
“सिद्धार्थचा फोन आला होता सकाळी. त्याला त्या खोलीत एक डायरी मिळाली होती ना, ती त्याने वाचून काढली…म्हणजे थोडी पानं राहिली आहेत त्याची वाचायची…पण त्याने त्या पानांचा फोटो काढून पाठवला आहे…हे बघ, मी प्रिंटआऊट काढली त्याची…तेच वाचतेय मी…ह्याच्यावरून आता सुजयचा, कटनीचा आणि सिद्धार्थला त्या खोलीत जी मुलगी दिसली तिचा….किंवा कोणत्यातरी मुलीचा काहीतरी संबंध होता, ह्याचा अंदाज बांधता येतोय…”
“काय ? एवढा महत्वाचा क्लू मिळालाय आणि तू एकटी वाचतेयस ना? मला उठवलं पण नाहीस?”
“आता ते महत्वाचं आहे का ? तू वाच ना नंतर…” सायली वैतागली
“पण सायले, सिद्धार्थ काय म्हणाला आणखी? त्याला त्या घरात विचित्र काही अनुभव आले, तसं पुन्हा काही झालं नाही ना?”
“असं काही बोलला तरी नाही तो….आणि अक्चुअली, माझा मोबाईल चार्ज करायचा राहिला होता म्हणून मी म्हटलं की नंतर बोलू असं….त्याची तीन दिवसांची रजा संपतेय आज…आज रात्री परत येणार होता तो…पण म्हणत होता की एक दिवस आणखी रजा घेतो म्हणून…ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना होणार असं विचारत होता…”
“मग तू काय म्हणालीस?” ईशा
“म्हटलं मी त्याला, ऑफिसमध्ये एकदा फोन करून स्टेटस घेते आणि मग कळवते तुला….”
“सायले धन्य आहेस तू….अगं आपल्याच कामासाठी गेलाय ना तो ….आणि तुझ्या हातात आहे त्याची रजा अप्रूव्ह करायचं….मग काय हरकत आहे? ”
“ठीक नाही वाटत गं ईशा…एकतर माझ्या पर्सनल कामासाठी मी ऑफिसमधल्या स्टाफची रजा अप्रूव्ह करणं हे तर पटत नाहीच आहे, पण त्याही पेक्षा सिद्धार्थने माझ्यासाठी हे सगळं करावं, मला फार ऑकवर्ड वाटतंय…तो काय माझा फियॉन्सी आहे, बॉयफ्रेंड आहे की नवरा आहे, म्हणून एवढ्या हक्काने मी हे करून घेतेय त्याच्याकडून….आणि हे सगळं झाल्यावर त्यानेच ह्यातून काही वेगळा अर्थ काढू नये, …ते एक टेन्शन आहेच….”
“सायले….डोन्ट स्टार्ट इट अगेन….मारेन हा मी तुला आता….आपण बोललोय ह्याच्यावर आल्रेडी….आणि प्लिज एवढा हातातोंडाशी आलेला घास आता सिद्धार्थला इथे परत बोलवून तू काढून घेणार आहेस का? एकतर तुला एवढं गिल्टी वाटायचं काहीच कारण नाहीये…तू त्याला पाठवलं नाहीयेस…तो स्वतः गेलाय तिथे…आता प्लिज तू नसते विचार करू नकोस…आणि त्याला काय वाटायचं असेल ते वाटूदेत…ते सगळं नंतर बघून घेऊ आपण…आत्ता जर तो परत आला तर हे पुढचं सगळं कसं कळणार आहे आपल्याला? ”
“बरं ठीक आहे…कळलं…आता तू येतेयस का ब्रश करून….तोपर्यंत मी हे वाचून घेते”
“मला पण वाचायचंय…बघू काय आहे ते?”
“आधी मी वाचणार…तू नंतर वाच….जा आणि आता …” तिला जवळजवळ ढकलतच सायली म्हणाली…
——————————————
“ईशी काय वाटतंय तुला हे वाचून ?”
त्यानंतर अर्ध्या तासाने त्या दोघी पुन्हा बोलत होत्या…
“अगं तुला कळतंय का सायले….आपण कदाचित ह्या शोधात खूप पुढे आलोय ह्या एका डायरीमुळे….अगं मगाशी तू म्हणालीस तेच तर झालंय ना…आत्तापर्यंत असा पुरावा हातात पडला नव्हता आपल्या….’ती‘ ने रात्री येऊन कटनीबद्दल सांगितलं म्हणून आपण गुगलवरून कटनीचा शोध लावला….पण आता ह्या डायरीवरून पक्कं लक्षात येतंय….सुजयचा, त्या मुलीचा आणि कटनीचा काहीतरी संबंध आहे…..”
“ते झालंच गं….पण मी विचार करतेय ‘ती‘ चा…हे सगळं वाचून तिच्याबद्दल काहीच अंदाज येत नाहीये गं…आय मिन, ‘ती‘ कोण आहे नक्की? ही डायरी जिने लिहिली ती? म्हणजे सुजयला तिथे जी इंदौरला आणि मग त्या लग्नात भेटली ती….? असं असेल तर म्हणजे तिचं काही बरं–वाईट झालं असेल का गं…”
“आता ते कळेलच ना नंतर…तो विचार आत्ता करून काही उपयोग आहे का? बरं …पण हे तर अर्धच मिळालंय आपल्याला….आणखी पुढचं लिहिलं असेल ना डायरीमध्ये…..”
“अगं हो….आहे…आणि सिद्धार्थ म्हणाला की पण होता की दहा–पंधरा मिनिटात पाठवतो बाकीच्या पेजेसचे फोटोज…त्याच्या फोनची मेमरी फुल झाली होती….पण आता बराच वेळ झाला, अजून त्याने पाठवलं कसं नाही?”
सायली बोलत होती खरी पण पुढे त्या मुलीचं खरंच बरं– वाईट झालं असेल का, हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. एखादा मुव्ही बघताना आपण जसं समोरच्या पात्राशी काहीही संबंध नसला तरीही थोड्या काळासाठी जोडले जातो, त्याची सुख–दुःख तेवढ्यापुरती आपल्याला आपलीशी वाटायला लागतात, तसं काहीतरी झालं तिचं…
“हे काय …..” ईशाच्या आवाजाने ती भानावर आली….”कधीच पाठवलंय तुला सिद्धार्थने ….तू हे एवढं वाचण्यात इतकी इन्व्हॉल्व्ह झाली होतीस की तुला माहित पण नाहीये….” ईशाने तिचा फोन तिच्या हातात ठेवत म्हटलं.
“थांब …हे असंच वाचायला नको….प्रिंटआऊट काढू….एक मिनिट…..” सायली लगबगीने उठली….
“लवकर आण सायले….” ईशाच्याही मनात तोच प्रश्न घर करून बसला होता खरं तर….
—————————————————————————————-
“आता पुढे काय पण….?”
सिद्धार्थ थोडा गोंधळला होता…सायली आणि ईशाला जी उत्सुकता होती, ती त्यालाही होतीच…म्हणून तर त्याने सकाळी उठल्या उठल्या डायरीतली बाकीची पानं वाचून काढली होती…पण आता पुढे कुठल्या दिशेने विचार करायचा हेच त्याला कळत नव्हतं. सायलीला त्याने म्हटलं तर होतं की आणखी एक दिवस रजा अप्रूव्ह कर म्हणून…म्हणजे त्याच्या हातात आजचा सगळा दिवस आणि उद्याचा दिवसही होता. पण आता ह्या दोन दिवसात नक्की काय करायचं…कुठल्या दिशेने शोध घ्यावा हेच त्याला कळत नव्हतं….
कदाचित……आत्ता डायरीतली जी पुढची पानं वाचली त्यात काहीतरी येऊन गेलं असेल ज्यामुळे पुढे काय करायचं ह्याचा अंदाज येईल….अचानक त्याच्या डोक्यात येऊन गेलं….आणि डायरीत वाचलेलं सगळं त्याच्या डोळ्यांसमोर यायला लागलं….
आता त्या मुलीच्या नजरेतून आणि अर्थात आपल्या सोयीसाठी मराठीतून …
—————————————————————————————
काल जबलपूरहून येईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. अम्मा दोन दिवस मामांकडे गेली म्हणून बरं झालं, मला काळजी नव्हती…पण आता आणखी काही दिवस ती नसणार तर मलाही कंटाळा येणार आहे…छू पण नाहीये ….शाळेत जाईन आता थोडे दिवस..गुरुजी म्हणालेच होते तसं…जमेल तेव्हा मुलांना गाणी, गोष्टी आणि जमलं तर भाषा शिकव म्हणाले होते….खरंच हिंदी शिकवायला जायला हवं मुलांना….पण भाषा शिकवायची तर रोजच्या रोज जावं लागेल, निदान आठवड्यातून तीन दिवस….मग माझ्या पुढच्या प्लॅन्स चं काही खरं नाही…पण जाऊदे…सध्या तरी जमेल तेव्हा शाळेत जाऊन मुलांना काहीतरी शिकवायला मिळेल, हे काही कमी नाही…
अम्मा नेहेमी म्हणत असते, काय एवढं डायरीत खरडत असतेस, म्हणे….बाबूजींना पण असंच म्हणायची…आणि मग बाबूजी हसत हसत म्हणायचे, सगळं मनातलं लिहून काढलंय, तुझ्याबद्दलसुद्धा बरंच वाईट–साईट लिहिलंय, मी घरात नसताना वाच हो हळूच…..अम्मा, बाबूजी आणि मी…किती छान दिवस होते ते….नंतर हळूहळू सगळंच बदललंय….पण माझ्यापुढे मोठं काम आहे….बाबूजींचं स्वप्न पूर्ण करण्याचं…त्याला न्याय देऊ शकेन की नाही माहित नाही, पण माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय मी….सगळे म्हणतात त्यांच्याकडची कला माझ्यात आलीये, गुरुजी म्हणतात आणि छू पण हेच म्हणते….खरं काय ते माहित नाही…आज अम्मा नाहीये तर डायरी लिहिताना किती शांत वाटतंय …रोज तिची बडबड चालूच असते मागून काहीतरी….ती आणि बाबूजी …दोघांबरोबरचे क्षण किती वेगळे तरी हवेसे वाटणारे..दोघंही फक्त माझ्याबद्दल स्वप्न बघणार….फक्त ती स्वप्न अगदी विरुद्ध दिशांना जाणारी..
बाबूजींना हळुवारपणा, हळवेपणा जास्त प्रिय….एखाद्या माणसाला भेटल्यावर ह्याच्या मनात आत्ता काय चालू असेल ह्याचा अंदाज बांधायचे ते सगळ्यात आधी…चांगुलपणा जपला पाहिजे, मुलांमध्ये रुजवला पाहिजे असं म्हणायचे…म्हणूनच मी शाळेत शिकवावं असं वाटायचं त्यांना…
आणि त्याच्या एकदम विरुद्ध अम्मा…प्रेमळ आहेच पण प्रॅक्टिकल, दुसऱ्यांना मदत करायला तयार असते पण त्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेणं तिला मान्य नाही…माझ्यात जो काही थोडाफार हट्टीपणा, कणखरपणा आलाय तो अम्माकडूनच….तिला स्वतःला फार शिकायला मिळालं नाही…त्यामुळे मी पुढे खूप शिकावं आणि खूप चांगलं करियर करावं असं तिला वाटतं….मला जमलं असतं तर तुला दुसऱ्या देशातही पाठवलं असतं पुढे शिकण्यासाठी…असं म्हणाली होती…
असे दोघांचे दोन वेगळे स्वभाव, मतं आणि स्वप्नं….दोघांनाही वाटायचं मी त्यांच्यासारखं व्हावं, त्यांचं स्वप्न पूर्ण करावं…पण त्या दोनपैकी माझा स्वभाव नक्की कसा झालाय? बाबुजींसारखा हळुवार, दुसऱ्यांचा विचार करणारा की अम्मा सारखा प्रॅक्टिकल…? अम्मा सारखी चिडचिड का करत असते त्याचं कारण माहित नाही का मला? माझा स्वभाव, स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची पद्धत, सगळं बाबुजींवर जातंय असं तिला वाटत असणार…अकॅडेमिक बॅकग्राऊंड एवढी स्ट्रॉंग असताना मी माझं लक्ष करियरवर न ठेवता बाबूजींचं स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणार म्हणून तिची घालमेल सुरु असते….तिचं काहीच चुकत नाहीये खरं तर…पण मग मी कसं वागू? काय करू?
अरे बापरे…दहा वाजून गेले…काल रात्री दमले होते म्हणून कालची डायरी आज लिहायला घेतली आणि वेळ कसा गेला कळलंच नाही…एरव्ही अम्मा आजूबाजूला असली की एवढं मनमोकळं लिहिता पण येत नाही….पण आता थांबायला हवं…दुकानातून सामान आणायचंय, लायब्ररीत जायचंय….आवरायला हवं….
————————————————–
अम्मा घरात नाहीये…बडबड करायला छू सुद्धा नाहीये तर फारच कंटाळवाणा गेला दिवस…संध्याकाळ तर जाता जात नव्हती…खरं तर हे डायरीत लिहू की नको असं झालंय…उगीच नको त्या गोष्टीला आपण जास्त महत्व देतोय का असं वाटतं…पण बाबूजी म्हणायचे, डायरी ही आपल्या मनाचा आरसा असली पाहिजे, जे मनात आहे तेच कागदावर उतरवून काढलं पाहिजे तरच मन हलकं होतं….
खरं तर हे सगळं छू ला पत्र लिहून कळवलं पाहिजे…परवा अंगावर दहीवडा सांडला म्हणून ज्या मुलाला ती पोलिसात द्यायला निघाली होती, तो मुलगा आज इथे आपल्या गावात आला होता हे कळलं तर काय रिएक्शन असेल तिची? नाकाचा शेंडा लाल होईल रागाने…
पण खरंच तो मुलगा इथे परत भेटेल असं वाटलं नव्हतं….सुजय….छान आहे नाव…
आज नेहेमीचं किराणाचं दुकान बंद होतं…चाचांना बरं नाही म्हणे..म्हणून बस स्टॉप समोरच्या दुकानात गेले सामान आणायला म्हणून तो भेटला….बसमधून नुकताच उतरला होता ….तोसुद्धा पाणी मागायला त्याच दुकानात…..जर चाचांच्या दुकानातच गेले असते तर तो भेटला तरी असता की नाही काय माहित…की भेटला असता? खरंच कोणत्या मित्राला भेटायला आला होता की……..जाऊदे मी असा विचार कशाला करतेय? पण मग त्याचा मित्र इथे कटनी मध्ये राहतो हे त्याने परवा, लग्नाच्या हॉलमधून बाहेर पडताना मी त्याला गावाचं नाव सांगितलं तेव्हा का नाही सांगितलं? खरं तर तो जबलपूरहून प्रवास करून आला होता तर त्याला निदान चहा–पाणी तरी द्यायला हवं होतं, घरी येण्याचं निमंत्रण द्यायला हवं होतं…पण मग अम्मा घरात नाही, छू पण नाहीये इथे……असं एकदम घरी कसं बोलावणार त्याला?
एक मात्र मान्य करायला हवं…त्याच्याशी बोलल्यावर छान वाटलं….बोलता–बोलता माझ्याबरोबर लायब्ररीमध्येसुद्धा आला तो…..मी पण लायब्ररीमध्ये येऊ का, असं म्हणाला….मी नाही कसं म्हणणार? मलापण वाचायला खूप आवडतं, असं म्हणाला….त्याची भाषा वेगळी, माझी वेगळी…तरीही पुस्तकांवर किती चर्चा केली आम्ही…वेळ कसा गेला कळलंही नाही…असं का वाटलं की आमची खूप दिवसांची ओळख आहे?
११ वाजत आलेत…झोपायला हवं…उद्या सकाळी शाळेत जायचंय….उद्या छूला सुद्धा फोन करते…भावाच्या लग्नाला गेली आहे की स्वतःच लग्न करून येतेय काय माहित….इतके दिवस काय करतेय तिथे….
———————————————————–
आज शाळेत शिकवायला मिळालं…किती छान वाटलं…मुलांमध्ये असताना खरंच खूप फ्रेश वाटतं. बाबूजी नेहेमी म्हणायचे, या जगात सगळ्यात निर्मळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे लहान मूल…खरंच आहे ते…ते एकूणच भावनांच्या राज्यात रमणारे जास्त….म्हणून तर त्यांना सायन्स विषय फारसा आवडायचा नाही, तो खूप प्रॅक्टिकल विषय आहे म्हणायचे…जे रिझल्ट्स समोर येतात ते दाखवतं…त्यात कुणाचं भाव–विश्व् नाही, कवी–कल्पना नाहीत, भविष्याची सुंदर स्वप्न नाहीत….सायन्स मुळे जी प्रगती झाली आहे त्यामुळे माझ्या मनात त्याबद्दल निश्चितच आदराचं स्थान आहे पण म्हणून माझ्यासारख्या माणसाच्या मनावर ते अधिराज्य करू शकत नाही….मला भुरळ पाडते ती एकच गोष्ट….साहित्य, कलाविश्व्….असं म्हणायचे….शाळेतल्या वातावरणात रमलं की बाबूजी मला जास्त कळतात …नेहेमीच…..त्यांना जे म्हणायचंय ते माझ्याशिवाय जास्त चांगलं कुणालाच कळू शकत नाही असं वाटतं….त्यांनाही असंच वाटलं असणार…म्हणून तर मला सोडून जाताना त्यांच्या डोळ्यात मला दिसलं ते सगळं…बोलू शकत नव्हते जास्त…पण तरीही त्यांची शेवटची इच्छा त्यांनी माझ्या कानात बोलून दाखवली आणि बाकी सगळं त्यांच्या डोळ्यातच दिसलं मला…मागची दोन वर्ष त्यांनी पाहिलेलं स्वप्न…ते अपूर्ण राहिल्याची खंत आणि ते मी पूर्ण करू शकेन, त्यांच्याही पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने…हा माझ्याबद्दलचा विश्वास काठोकाठ डोळ्यात भरून राहिला होता त्यांच्या….कायमचे मिटण्यापूर्वीचे बाबूजींचे ते डोळे….अगणित स्वप्न डोळ्यात साठवून आणि तीच स्वप्न मला देऊन गेलेत ते….
डोळे भरून आलेत…ह्या आठवणी त्रास देतात तरीही त्या हव्याहव्याशा वाटतात, कारण त्यात बाबुजींबरोबरचे क्षण भरून राहिलेत….
एरव्ही हे सगळं छू ला सांगते मी….कितीही बडबड केली तरी ती बोअर नाही होत….हे सगळं किती वेळा तिला सांगितलंय मला आठवतही नाही, पण तरी प्रत्येक वेळा ती शांतपणे ऐकून घेते…कहा हो माय डिअर फ्रेंड? तुम नही तो डायरी ही सही…..
पण आज फोनवर तिच्याशी बोलून किती बरं वाटलं…आणखी एक आठवडा थांबणार आहे इथे….मला खूप कंटाळा येणार आहे….शाळेत जाईन जमेल तेव्हा…
पण तो मुलगा – सुजय, आज शाळेतही आला होता हे छूला सांगितलं तर कसली संतापली होती…पण ती म्हणत होती ते सुद्धा पटलं मला….काल म्हणे तो मित्राला भेटायला म्हणून आमच्या गावात आला आणि आज काय, तर गावातल्या सगळ्या शाळा बघायच्या होत्या त्याला…दोन्ही कारणं मला पटली नाहीच आहेत खरं तर…दोन्ही ठिकाणी तो भेटला हा योगायोग कशावरून असेल? छू म्हणाली तसं तो मला भेटण्यासाठी तर येत नसेल? पण ती म्हणाली तसं त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे वगैरे असं नाही वाटत मला….साधा, सरळ तर आहे…त्याच्याशी बोलताना सुद्धा फार मोकळं वाटतं…असं वाटतं की मनातलं सगळं मी त्याच्याशी बोलू शकेन…छू आपली त्या दिवशीचं भांडणच पकडून बसली आहे…म्हणूनच तिच्या मनात अजून इतका राग आहे त्याच्याबद्दल….आता फोनवर किती आणि काय, काय समजावणार तिला…परत आली की बघू….तोपर्यंत तो सुजय तरी इथे राहील का काय माहित…..
पण एक प्रश्न राहून राहून मनात येतोच आहे….दोन दिवस आमची भेट झाली हा खरंच योगायोग होता की तो मलाच भेटायला आला होता?
क्रमशः
Nice part but middle part missing lag raha hai mam. please post next part as soon as possible.
LikeLike