पण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतं…प्रशांत आणि तो ठरवून हिंदीतून बोलले होते, आणि दुसरा फोन ज्याचा होता, तो त्याचा मित्र हिंदीच बोलायचा…त्यामुळे हे सगळं संभाषण त्या व्यक्तीला समजतही होतं….शरीर साथ देत नव्हतं तरी कानात प्राण आणून जिने त्याचं बोलणं ऐकलं होतं… ती..अम्मा..
————————- आता पुढे ——————–
त्या परिस्थितीत तिला त्याचं बोलणं ऐकू आलं तरी समजलं असेल का, आता कोण सांगणार आपल्याला? पण एक मात्र खरं की अचानक तब्येत बिघडली आणि समोर मृत्यूची चाहूल लागल्यावर तिला कोमलची प्रचंड काळजी वाटायला लागली, सुजयबद्दल तिच्याचकडून जे समजलं होतं त्यावरून तो तिला एकमेव आधार असल्यासारखा वाटला….निदान त्या वेळी तरी…तिच्या सगळ्या आशा त्याच्याभोवती एकवटल्या होत्या…त्यामुळेच तिने हाताने त्याला जवळ बोलावलं होतं..
त्याच्याकडून काही प्रतिसाद नव्हता पण तरी तिची आशा कमी झाली नाही…शरीरातली सगळी शक्ती एकवटून ती त्याच्याशी संवाद साधू बघत होती, त्याचवेळी त्याला हे फोन आले…माझ्या अंदाजाप्रमाणे अम्माला त्याच्या बोलण्यावरून अंदाज आला त्याच्या हेतूचा…
त्या अवस्थेत त्याचं सगळंच बोलणं तिला कळलं असेल असं नाही पण तिला हा मुलगा कोमलला फसवणार असं लक्षात आलं असावं….त्या कादंबरीबद्दल तर तिलाही बिचारीला आत्ता काही तासांपूर्वी कळलं होतं…पण कोमलने सांगितलेलं नाव ‘अग्यात की खोज में‘ ते लक्षात राहिलं होतं…त्याच्या तोंडून फोनवर बोलताना ते नाव तिने ऐकलं आणि ती सावध झाली..
“प….आ….या..” शरीरातली सगळी शक्ती एकवटून ती पुन्हा त्याच्याशी काहीतरी बोलली. ह्यावेळी फोनमधल्या मेसेजेस मधून डोकं काढून सुजयने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा फोन मध्ये डोकं घातलं…ह्या अम्माकडे फार वेळा बघायलाच नको..कशी बघतेय माझ्याकडे…आता त्या कोमलला भेटून आपण लग्न करणार नाही असं सांगून टाकू, नाहीतर उगीच सारखे फोन येत बसतील तिचे…कधी येतेय कुणास ठाऊक…
तिने त्याला दिलेल्या कादंबरीबद्दल ती आत्ता ह्या परिस्थितीत काही विचारणार नाही ह्याची त्याला खात्री होती.
आणि तेवढ्यात –
समोरून आलेल्या एका भयानक जीवघेण्या किंचाळीने त्याच्या छातीचा ठोकाच चुकला…त्याने पुन्हा फोनमधून डोकं काढून समोर बघितलं…
समोर अम्माचं जे रूप त्याला दिसलं, ते बघून त्याचं धाबंच दणाणलं. मघापर्यंत विव्हळणारी, दमलेली, असंबद्ध बोलणारी अम्मा डोळे रोखून त्याच्याकडे बघत होती. त्या डोळ्यात संतापाचे निखारे होते. जणू काही ते डोळे त्याला इशारा देत होते. तोंडातून बाहेर पडणाऱ्या त्या असंबद्ध शब्दांना आता एक धार चढली होती…त्या शेजारच्या म्हाताऱ्या बाईच्या म्हणण्यानुसार, अम्माचं ते रूप बघताच सुजयची भीतीने गाळणच उडाली. तो अक्षरशः तिथून पळतच बाहेर निघाला…एकदा हॉस्पिटलच्या त्या रूमच्या बाहेर पडायच्या आधी त्याने पुन्हा धीर करून मागे वळून पाहिलं…अम्माची ती तीक्ष्ण नजर, ते रोखलेले डोळे त्याचा पाठलाग करतच होते..तिची ती नजर त्याच्यावरच खिळून राहिली होती…तो एक क्षणभरही तिथे न थांबता पळत सुटला…हळूहळू नजरेच्या टप्प्याआड गेला.
तो दृष्टीआड झाल्यावर मात्र अम्माला एकदम जोरात धाप लागली. त्या अवस्थेत तिने ही ताकद कुठून आणली तिच्यात? बिचारी, तिच्या त्या किंचाळीमध्ये राग, संताप ह्या भावनांपेक्षा असहाय्य्यता जास्त असणार…मरणाच्या दारात असताना, त्या शेवटच्या क्षणी तिला जे कळलं होतं, ते तिला स्वतःच्या मुलीपर्यंत नक्कीच पोहोचवायचं असणार…पण तिचं शरीर ते सांगण्यापुरतंही तिला साथ देणार नव्हतं, हे तिला कळलं होतं…त्या शेवटच्या क्षणी स्वतःच्या मुलीच्या बाबतीत पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज तिला आला होता, आणि त्यावेळी तिला सावरायला आपण नसणार ह्याची असहायता…हे सगळं आता बोलण्यापुरता वेळ आणि शक्ती आपल्यात नाही ही असहायता…सगळं सहन न होऊन स्वतःमधली उरलीसुरली सगळी ताकद पणाला लावून तिने तोंड उघडलं पण एक जीवघेणी किंचाळीच तिच्या तोंडून बाहेर पडली..
—————————————
“सायले, म्हणजे नक्कीच अम्मा मृत्यूनंतरही त्या सुजयवर लक्ष ठेवून होती…त्यावेळी ती हेल्पलेस होती पण त्याच्याबद्दलची चीड, सुडाची भावना तशीच मनात ठेवून ती गेली….तिच्या मुलीने घेतलेली प्रचंड मेहनत, स्वतःच्या भविष्याबद्दल बघितलेली स्वप्नं, त्यासाठी केलेली धडपड सगळं सुजयच्या स्वार्थीपणा मुळे मातीमोल झालं होतं, तिच्या मुलीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या मेहनतीवर नाव मात्र दुसऱ्याच कुणाचं लागणार…तिच्या मुलीला लग्नाचं प्रॉमिस करून नंतर तिच्या भावनांचा विचार न करता तो तिथून पळून गेला, ह्याबद्दल तिला नक्कीच त्याचा सूड घ्यायचा असणार…..बरोबर ना माई आजी..मगाशी आपण ह्याच विषयावर बोलत होतो…तुला काय वाटतं ?”
“असंच काहीसं वाटतं हो मला…ऐकवत नाही खरं म्हणजे…शेवटच्या क्षणी अशी असहाय्य्यता कुणाच्या वाट्याला येऊ नये हो…शारीरिक त्रास एकवेळ माणूस सहन करतो…ह्या कोमलच्या बाबतीत, ती त्या सुजयला भेटली नसती, पुढचं सगळं घडलं नसतं तर असं अनपेक्षित मरण येताना तिची आई फक्त आपल्यामागे तिचं कसं होईल ही काळजी करत गेली असती पण हे सगळं झाल्यानंतर त्या मुलाबद्दलचा संताप, सुडाची भावना हे सगळं जिवंत राहिलं तिच्या मनात…कदाचित मुलीच्या लग्नाच्या विषयावरून पुढचं हे सगळं घडलं होतं, त्यामुळे ती त्या सुजयच्याही लग्नाच्या आड येत राहिली दर वेळी…त्याचं लग्न ठरलं की त्या मुलीला किंवा तिच्या जवळच्यांना भेटत राहायची……सायले, आठवतंय ना तुला बायो?”
सुजयशी लग्न ठरल्यावर पडलेलं ते स्वप्न, त्यानंतर त्याला भेटल्यावर रात्री दिसलेला तो पांढराफटक चेहरा, त्यानंतर त्याच्या घरी अचानक जाऊन त्याला भेटल्यावर त्या दिवशी रात्री बाथरूममध्ये ईशाला झालेला भास, साखरपुड्याच्या दिवशी सकाळी झालेले भास, साखरपुड्याच्या दिवशी रात्री वरच्या खोलीत दिसलेली ‘ती‘ आणि ऐकू आलेले भेसूर भयानक आवाज, कामवालीला भेटायला त्यांच्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर सुजय भेटला आणि त्या दिवशी रात्री झालेले भास, त्याच रात्री ऐकू आलेले आणि नंतर ईशाबरोबर बसून अर्थ लावलेले शब्द, त्यातून मिळालेला पुढचा मार्ग आणि सिद्धार्थचा कटनीचा प्रवास…..आजपर्यंतचा सगळा प्रवास…
हे इथपर्यंत पोहोचण्यात कोमलच्या अम्माने मदत केली तर आपली…दुसऱ्या जगात राहून, शरीराची साथ नसताना, मनात जाग्या ठेवलेल्या एका भावनेच्या आधारावर….हे सगळं झालं नसतं तर आपण कोमल आणि छू पर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो…सायलीच्या डोळ्यांसमोरून ती सगळी भास–आभासांची मालिकाच तरळून गेली, त्यातली ‘ती‘ दिसली आणि आता ते सगळं आठवताना ‘ती‘च्या भयानक चेहऱ्याच्या जागी तिने कल्पना केलेला अम्माचा चेहरा दिसायला लागला…
“पण मग काय झालं नंतर छू?”
—————————————–
हॉस्पिटलमधल्या त्या म्हाताऱ्या बाईकडून कोमलला हे जे कळलं, त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं…सुजय आला होता आणि तिला न भेटताच गेला होता. आणि फोनवर झालेलं त्याचं बोलणं,…आत्तापर्यंत तिला भेटलेला सुजय असा नव्हताच कधी…अम्माला काय वाटलं असेल…सगळं माझ्या मुर्खपणामुळे झालंय….एक एक आठवण मनात येत गेली तसं तिचं मन निराशेनं झाकोळून गेलं…
——————————————-
त्या दिवशी रात्री कोमलच्या तोंडून ही सगळी हकीकत समजली आणि मी अक्षरशः हादरले…अम्माचा शेवट असा झाला तो धक्का होताच पण आता ह्या सगळ्या गोष्टीला पंधरा दिवस झाले होते…दुःखाची धार थोडी बोथट व्हायला लागली होती..खरं शॉकिंग होतं अज्ञाताच्या शोधाबद्दल जे कळलं ते…कोमल तर सगळ्याच बाबतीत इतकी टोकाची निराशेला पोहोचलेली होती की तिने ह्याबाबतीत आत्तापर्यंत काहीही हालचाल केलेली नव्हती. तिने सुजयला फक्त काही वेळा फोन ट्राय केला होता पण अर्थात त्याने उचलला नाहीच.
त्या म्हाताऱ्या बाईने फोनवरचं त्याचं जे संभाषण कोमलला सांगितलं, त्यावरून त्याने बाबूजी आणि कोमलने लिहिलेली कादंबरी कोणत्यातरी मित्राकडे आत्तापर्यंत पोहोचवली असणार आणि कदाचित काही लोकांची मदत घेऊन ते ती कादंबरी आता नीट सरळ वाचता येईल अशी पुन्हा टाईप करून घेण्याच्या कामात असणार असा माझा अंदाज होता…ह्या पुढे ते त्याचा उपयोग नक्की कसा करतील? सांगणं कठीण होतं पण एकूण सुजय हे करायला तयार झाला म्हणजे त्याचा नक्कीच कोणतातरी मोठा फायदा असणार ह्यात, बहुतेक आर्थिक फायदाच…आम्ही एक–एक अंदाज बांधत होतो..आता काय करायचं? नक्की काय करावं काही कळेना…त्याच्या घरी जावं म्हटलं तर पत्ता असा नव्हताच आमच्याकडे….शहराचं नाव माहित असून काय करणार? ज्या मैत्रिणीच्या भावाच्या लग्नात ते भेटले, त्या घरून माहिती मिळवता आली असती खरं तर…पण कोमलने ठाम नकार दिला…तिला हे सगळं आणखी कुणालाच कळायला नको होतं. शेवटी विचार करता करता मलाच एक मार्ग सुचला.
कोमलला मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लेंट नोंदवुया असा सल्ला दिला. ती आधी नाहीच म्हणाली. एकूण मागच्या पंधरा दिवसात झालेल्या मानसिक दगदग आणि दुःखामुळे खचली होती ती…हरल्यासारखी झाली होती..तिने आता सगळ्याच आशा सोडल्या होत्या. पण त्या सुजयला असंच सोडून देणं माझ्यासाठी शक्य नव्हतं..काहीतरी प्रयत्न करायलाच हवा होता. कोमलला बळेबळेच तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आम्ही सुजयविरुद्ध कम्प्लेंट नोंदवली…कोमल आणि तिच्या बाबूजींनी लिहिलेली कादंबरी सुजयने चोरून नेली ह्यासाठी.
——————————————
“खरं तर कॉपीराईट्स घ्यायला हवे होते….एवढं ओरिजिनल काम तुमचं, एवढी मेहनत…” सिद्धार्थ
“पण कादंबरी पब्लिश कुठे झाली होती ना कॉपीराईट्स घ्यायला…” ईशा
“पब्लिश होण्याची गरज नसते, पब्लिश्ड किंवा अनपब्लिश्ड दोन्ही प्रकारच्या लिखाणासाठी कॉपीराईट्स घेऊ शकतो. खरं तर कुठल्याही ओरिजिनल वर्कवर बाय डिफॉल्ट कॉपीराईट्स लागू होतात, पण कुठले लीगल इशूज आले तर एव्हिडन्स हवा, त्यासाठी ते काम कॉपीराईट्स ऍक्टसच्या अंडर रजिस्टर केलेलं चांगलं…पण या केसमध्ये कोमलची स्टोरी पूर्ण झालेली नव्हती ना…कदाचित पुढे तिने कोणाच्या तरी सल्ल्याने हे सगळं केलंही असतं, पण त्यासाठी तिने तिची कथा पूर्ण होण्याची वाट तरी बघितलीच असती ना…त्यामुळे पोलीस कम्प्लेंट केली तो एकच मार्ग होता त्यावेळी असंच दिसतंय…” सायलीचे बाबा
“आणि त्याचं पोलीस कंप्लेटमध्ये कोमलचा पत्ता मिळाला मला..म्हणून तर तिच्या घरापर्यंत येऊन पोहोचलो…ती नाहीच भेटली पण निदान शेजारी निरोप ठेवल्यामुळे ट्रेनच्या वेळेला छू तरी आली भेटायला…” सिद्धार्थ
“पण मग ती कम्प्लेंट ‘माही‘ म्हणून कोणीतरी केली होती ना?” सायली
“हो, हो…बरोबर…ही माही कोण? कारण ‘ती‘कडून आपल्याला दोन नावं कळली होती, कटनी आणि माही. त्यापैकी माही नावाचा काही उल्लेखच नाही आला अजून…” ईशा
“माही म्हणजे दुसरं–तिसरं कुणी नाही, कोमलच…माही हे तिचं अम्माने ठेवलेलं नाव. आणि कोमल हे बाबूजींच्या आवडीचं नाव. अम्मा आणि बाबूजींच्या स्वभावातला फरक इथेही दिसून येतो…दोघेही तिला त्यांनी ठेवलेल्या नावानेच हाक मारायचे..अम्माच्या हट्टामुळे बर्थ सर्टिफिकेट पासून सगळीकडे तिचं माही हेच नाव लागलं. पण अम्मा सोडून कोणीच तिला त्या नावाने हाक मारायचं नाही. सगळे कोमलच म्हणायचे. अगदी कोमलसुद्धा शाळेच्या आणि कॉलेजच्या परीक्षा सोडल्या तर इतर सगळीकडे ‘कोमल‘ हेच नाव लावायची स्वतःचं. पोलीस स्टेशनला आम्हाला अर्थात तिचं कागदोपत्री जे नाव आहे तेच द्यावं लागलं..” छू
“ओह…अच्छा…म्हणजे म्हणून ‘ती‘ कडून आपल्याला ‘माही ‘ हे नाव कळलं…’कोमल‘ ‘नाही. “सायली
“मग नंतर त्या पोलीस कंप्लेटमुळे काही झालं? म्हणजे पोलिसांनी त्या कंप्लेटच्या बेसिसवर जाऊन निदान त्या सुजयला शोधून त्याला जाब तरी विचारला असेल ना ?” सायलीचे बाबा
——————————————–
तसं नाही झालं…दर आठवड्याला जाऊन मी आणि कोमल पोलीस स्टेशमध्ये चौकशी करायचो. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की तो फरार आहे, त्याला शोधतोय. नंतर थोडे दिवसांनी त्यांनी आम्हालाच प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुमच्याकडे काय पुरावा आहे त्याच्याविरुद्ध वगैरे…नंतर नंतर तर ते आम्हाला उडवा–उडवीची उत्तरं द्यायला लागले…उद्या या, परवा या असं. पुढचा महिनाभर ह्यातच गेला. कोमलने तर आता आशाच सोडली होती…
ह्या दिवसात ती प्रचंड हळवी झाली होती. अम्मा अशी अचानक सोडून गेलेली, कोमलने तिला बोलवून घेतलं आणि तिचं ऍक्सीडेन्ट झाला ह्याचं गिल्ट मनात घेऊन जगत होती. सुजयबरोबर पुढचं आयुष्य घालवायची स्वप्नं थोडे दिवस का होईना बघितली होती. त्याच्यात गुंतली होती, त्यातून बाहेर पडली ती कशीबशी..पण त्याने केलेल्या फसवणुकीची भावना मनात घर करून बसली होती….बाबूजींचं स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही ह्याचं आणखी गिल्ट मनात…
ह्या काळात मी खरोखर तिच्या मनस्थितीचा धसका घेतला होता…तिने मला प्रॉमिस केलं होतं तरी मनात साठलेल्या प्रचंड निराशेपोटी ती जीवाचं काही बरं–वाईट करून घेईल ह्याची मला खूप भीती वाटायची…मी जमेल तितकं, खरं तर दिवस–रात्रच तिच्या बरोबर राहायला लागले….माझं सामान तिच्याच घरात शिफ्ट केलं. पण अर्थात मी तिच्याबरोबर असं कायम राहायला सुद्धा मर्यादा होत्या..माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलं होतं. कधीतरी तो भेटायला यायचा तेव्हा कोमलला सोडून काही वेळ तरी जावंच लागायचं. पुढच्या महिन्याभरात आमचं लग्न होतं. कोमलला मी माझ्याबरोबर जबरदस्तीने सगळीकडे न्यायचे. खरेदीला, बाकी सगळ्या गोष्टी ठरवायला…
तिला पुन्हा थोडं पूर्वीसारखं करण्यासाठी दोन गोष्टी माझ्या डोक्यात होत्या…कादंबरीची लिखित प्रत जरी सुजय घेऊन गेलेला असला तरी सॉफ्ट कॉपी होतीच की आमच्याकडे..शेवटचं दहाच टक्के लिखाण बाकी होतं…पुन्हा जोमाने सगळं सुरु करायचं. हे एक, आणि दुसरं म्हणजे शाळेच्या कामात तिची जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्हमेंट. जितकी ती शाळेत जास्त रमेल तितकी ह्यातून जास्त लवकर बाहेर येईल ह्याची मला खात्री होती.
कोमलच्या मागे लागून तिला पुन्हा कादंबरीचं काम सुरु करायला लावलं …लिहिण्याचं काम सुरु झालं आणि कोमल हळूहळू सावरायला लागली…रोज शाळेतही शिकवायला जायला लागली….हळूहळू माझी पूर्वीची कोमल मला पुन्हा दिसायला लागली.
अम्माला जाऊन आणि कादंबरीची चोरी होऊन आता चार महिने होत आले…कोमलची कथा आता पूर्ण झाली..आता फक्त आमच्याकडे असलेल्या सॉफ्टकॉपी च्या प्रिंटाऊट्स घेऊन नीट बांधणी, सजावट करून, कादंबरीला छान आखीव–रेखीव करून मग पुढच्या पंधरा दिवसात स्पर्धेसाठी पाठवायचं होतं. आमच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाल्या. अम्मा, बाबूजींचं स्वप्नं आता पुन्हा दृष्टीक्षेपात आलं.
पण इथेही कोमलच्या नशिबाने तिची साथ दिली नाहीच. एक दिवस एका लिडिंग इंग्लिश न्यूजपेपर मध्ये एक जवळपास अर्धं पान भरून एक मोठी जाहिरात आली. जाहिरातीबरोबर भरपूर मजकूरही छापून आलेला होता.. पेपरमधल्या एंटरटेनमेंट सेक्शनमध्ये मला नेहेमीच इंटरेस्ट असतो, त्यात एवढी मोठी जाहिरात…हातातली सगळी कामं सोडून मी ते वाचायला घेतलं…पण मी वाचायला सुरुवात केली आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो विषय तर आता माझ्या चांगल्या लक्षात आलाच होता, पण ती लेखनशैली, कथेतल्या पात्रांची नावं, सगळं सगळं माझ्या अगदी जवळून ओळखीचं होतं….अज्ञात म्हणजे नक्की काय, शिवाय अदृश्य म्हणजे नक्की काय, अज्ञात आणि अदृश्य म्हणजे केवळ भूत, पिशाच्च असल्याचं गोष्टी असतात असं आपण मानतो…..पण अशा आणखीही काही गोष्टी असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत किंवा आपल्याला माहीतही नसतात, पण जगातल्या सगळ्यांनाच नसेल पण काही लोकांना तरी त्यांचा प्रत्यय येतोच, अशी साधारण ह्या जाहिरातीची प्रस्तावना होती. त्यानंतर ह्या विषयावरची काही इंटरेस्टिंग फॅक्टस लिहिली होती आणि मग ह्या कथेतील पात्रांची थोडक्यात ओळख, त्यांच्या भोवती रचली गेलेली कथा, त्यात त्यांना कोणते असे अनुभव येणार आहेत वगैरे अशी माहिती देऊन ह्या माहितीवरचा मुव्ही पुढच्या वर्षी येतोय वगैरे अशी माहिती दिली होती…
हे वाचून झाल्यावर मी कोमलकडे धाव घेतली. ते वाचून तिचे तर हातपायच गळल्यासारखे झाले…तिने आणि बाबूजींनी गेले वर्षभर मेहनत करून केलेला ह्या विषयावरचा अभ्यास, रात्र रात्र जागून वाचलेली ह्या विषयावरची पुस्तकं, त्या विषयाची माहिती असलेल्या लोकांच्या घेतलेल्या भेटी, तासनतास सायबर कॅफेमध्ये बसून इंटरनेट वरून वाचून काढलेले ह्या विषयावरचे लेख, बाबूजींच्या आणि तिच्या ह्या विषयावरच्या रंगलेल्या चर्चा…सगळं सगळं ह्या एका जाहिरातीने पुसून टाकलं होतं…तोच विषय, तीच माहिती, तीच कथा, कथेतील पात्रांची नावंही तीच…त्यात कथा आणि पटकथा लेखक म्हणून नाव मात्र भलत्याच कुणाचं….
आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला धाव घेतली…मधल्या काळात तिथले इन्स्पेक्टर बदलले होते..ह्या वेळी आमची तक्रार त्यांनी नीट ऐकली. ह्यावेळी तक्रार सुजयच्या विरुद्ध न करता, सिनेमाच्या प्रोड्युसरच्या आणि लेखकाच्या विरुद्ध करा, असं त्यांनीच सजेस्ट केलं . आम्ही पुरावा म्हणून स्पर्धेसाठी तयार केलेली कादंबरी नेलेली होती…त्यांनी ती चाळून एकदा खात्री करून घेतली. ह्या प्रकारात त्यांच्या नेहेमीच्या प्रोसिजर प्रमाणे कारवाई होईल, आम्ही थोडे दिवसांनी तुम्हाला अपडेट्स देत राहू, असं सांगितलं…आता आमच्या तक्रारीच्या बेसिसवर त्या लोकांकडे जाऊन आम्ही त्यांची उलट–तपासणी घेऊ, त्यांच्याकडचे पुरावे तपासून पाहू आणि मग पुढचं पुढे, साधारण अशी प्रोसिजर असते असं आम्हाला सांगितलं.
पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही दोघीही हताश झालो होतो…करण्यासारखं जे काही आमच्या हातात होतं ते आम्ही केलेलं होतं..आता पुढे नक्की काय होईल काहीच अंदाज येत नव्हता. निदान यावेळी पोलीस स्टेशनमधून तरी चांगलं कोऑपरेशन मिळत होतं…पण अर्थात, नुकसान आल्रेडी झालेलं होतं. स्पर्धेच्या तारखेपर्यंत काही ह्या सगळ्याचा निकाल लागेल असं वाटत नव्हतं.. आता फक्त पंधरा दिवस उरले होते सबमिशन साठी…आणि तसंच पाठवलं तरी ते रिजेक्ट होणार हे नक्की होतं.
ह्या सगळ्या नंतर सगळं बिघडतच गेलं..एकीकडे कोमलची साथ देणं आणि दुसरीकडे माझ्या लग्नाची धावपळ…खरं तर ह्या सगळ्या अशा परिस्थितीत मला लग्न करायचं नव्हतं…माझी जिवाभावाची मैत्रीण इतकी दुःखात असताना मी लग्न करायचं, मला पटत नव्हतं…पण मैत्रिणीसाठी लग्न पुढे ढकलणं हे घरच्यांना कसं पचनी पडेल? माझ्या आई–बाबांना निदान सगळ्याची कल्पना तरी होती पण अर्जुनच्या घरचे तयार व्हायचे काहीच चान्सेस नव्हते…शेवटी अर्जुननेच मार्ग काढला..त्यांनी त्याच्या ऑफिसमधून कटनीच्या जवळच्या लोकेशनचा प्रोजेक्ट मागून घेतला, जेणेकरून आम्हाला दोघांना लग्नानंतर कटनीला कोमलच्या जवळ राहता येईल….ह्या एका बाबतीत मी खूप लकी आहे…माझ्या मनातलं अक्षरशः माझ्याही आधी ओळखणारा आणि मला साथ देणारा नवरा मिळाला मला…अर्थात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या सगळ्याचं श्रेय माझ्या मैत्रिणीला…तिने सांगितलं नसतं तर मी कदाचित अर्जुनला भेटलेही नसते…जोड्या स्वर्गात बनतात असं असलं तरी इथे पृथ्वीवर त्यांना एकत्र आणणारा कोणतातरी दुवा असावाच लागतो, माझ्या बाबतीत माझ्या कोमलने ते काम केलं होतं…असो, तर पूढे ….
तर एकूण अशा धावपळीत आणखी तीनेक आठवडे गेले असतील. पोलीस स्टेशनला मध्ये मध्ये जाऊन चौकशी करणं चालूच होतं…ह्यावेळी निदान काहीतरी समाधानकारक उत्तरं तरी आम्हाला मिळत होती…माझ्या लग्नाला तीन–चार दिवस राहिले असतील…खूप धावपळ चालू होती..आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या केसच्या बाबतीत आणखी काही प्रगती आहे का हे बघायचं ठरवलं. कारण लग्न झाल्यावर काही दिवस तरी मला पोलीस स्टेशनला जाता आलं नसतंच. पण त्या दिवशी नेमके आमच्या केसवर काम करणारे ते इन्पेक्टर रजेवर होते त्यामुळे हे सगळं पुढे कुठपर्यंत आलंय हे काही आम्हाला कळू शकलं नाही…आम्ही परत जायला निघालो तेवढ्यात एक हवालदार म्हणाला,
“मॅडम एक सल्ला देऊ का तुम्हाला? कशाला नसत्या भानगडीत पडताय? नाही, तुमचं नुकसान झालाय हे मान्य…पण आता ही कम्प्लेंट करून आणखी नुकसान कशाला करून घेताय? हे एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस, त्यांना काय फरक पडणार आहे तुमच्या कंप्लेटने? उगीच मीडियावाल्यांना चघळायला विषय देताय तुम्ही…ह्यातून हातात काहीच नाही पडणार आणि उगीच नको तो ससेमिरा मागे लागेल तुमच्या…आणि कुणी सांगावं? त्यांचं फारच नुकसान होणार असेल तर आणखी काही करायलाही कमी नाही करणार हे लोक..उद्या हा असला वाद मीडियासमोर गेला, तर त्याचं प्रोजेक्ट सुरु होण्याआधीच बारगळायचं…स्वतःचं एवढं मोठं नुकसान कोण सहन करणार हो…म्हणून म्हणतोय गोष्टी आणखी पुढे जायच्या आधी कम्प्लेंट मागे घ्या…जीवापेक्षा मोठं काही नसतं शेवटी“
त्याच्या बोलण्याने आम्ही दोघी पुरत्या हादरून गेलो होतो खरं तर…पण असं तडकाफडकी तक्रार मागे का म्हणून घ्यायची? कोमल ह्याला तयार नव्हती..मलाही ते फारसं पटत नव्हतं. आणि आता लग्नाच्या धावपळीत आम्हाला दोघींना ह्यावर बसून बोलण्याइतकीही उसंत मिळणार नव्हती. कोमलला माझ्या लग्नात असले विषयही आणायचे नव्हते. शेवटी आणखी काही दिवस थांबून अंदाज घ्यायचा असं आम्ही ठरवलं. तसंही लग्नासाठी म्हणून माझ्या घरीच राहणार होती ती काही दिवस…घरी नातेवाईक येणार होते…घर अगदी भरलेलं असणार होतं. कुणी तिला एकटीला गाठून काही करू शकेल असं अजिबात नव्हतं, असा विचार करून मी पण निर्धास्त होते..
पण पुढे जे होणार होतं ते आमच्या दोघींच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं….इतकं होऊनही चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहेमी चांगलंच होतं, आपल्याला न्याय नक्की मिळेल ह्यावर कोमलचा विश्वास होता. तिच्याकडे बघून मीसुद्धा ह्या बाबतीत तिच्या मनात कधीही निगेटिव्ह विचार भरवले नाहीत. पण तो सुजय भेटल्यापासून कोमलच्या नशिबाने तिच्याकडे जी पाठ फिरवली ती कायमचीच…
———————————–
डोळ्यांतून घळाघळा येणारं पाणी पुसून, हुंदके देत ती शांतच बसून राहिली…सगळ्यांच्या नजरा आणि कान तिच्याकडे लागले होते…सायलीने तिच्या नवऱ्याकडे, त्या अर्जुनकडे बघितलं….”जरा थांबा, मी सांगतो..” अशी खूण करून तो तिच्याजवळ गेला. तिला समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास देऊन तिच्या जवळ बसत म्हणाला,
“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ आली आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत…प्लिज सगळं सांगूया त्यांना….येताना कोमलच्या फोटोशी तुला बोलताना आणि मग फोटो पर्समध्ये टाकताना बघितलंय मी…ती सुद्धा वाट बघतेय छू.”
“कोमलचा फोटो? म्हणजे?”
क्रमशः
पुढचा भाग शुक्रवारी …