“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यात…हे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण त्याचा निदान शोध तरी घेता येईल, पण ही गोष्ट नक्की काय आहे हे आम्हाला असं एरव्ही कधीच कळलं नसतं….आता फक्त हे कळायला हवं आम्हाला भेटायला येणारी ती नक्की कोण आहे आणि सुजयशी तिचा नक्की काय संबंध आहे…..”
“कळेल हो…लवकरच कळेल…”
तेवढ्यात बेल वाजली…
“माई आजी, सायली आली बहुतेक…आय एम सो एक्सआयटेड टू नो, त्या खऱ्या सुजयच्या घरी नक्की काय झालं ते..”
धावत जाऊन ईशाने दार उघडलं…समोर सिद्धार्थ उभा होता…
———————- भाग ४३ पासून पुढे ————–
*******************************************************************
पुढचा भाग पोस्ट करण्यासाठी बराच उशीर झालाय. त्याबद्दल मनापासून सॉरी….कथा कुठपर्यंत आली होती ह्याचा थोडक्यात फ्लॅशबॅक–
— सुजयच्या आईने सायली घरी येऊन गेल्याचं तिचा फोटो बघून कन्फर्म केलंय. सायली आपल्या घरापर्यंत कशी येऊन पोहोचली ह्याबद्दल सुजय बुचकळ्यात पडलाय…तिला संशय आलाय का आणि तिच्या घरात लग्नाची तयारी कशी चालू आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी तो अचानक काही न कळवता सकाळीच सायलीच्या घरी जातो.
— सायली आणि तिचे आई-वडील ह्याच वेळी सु.सा.च्या घरी गेलेत. तिथे त्याच्या आई-वडिलांच्या कानावर सगळं घालून, आता तो, ह्या सुजयला मदत करणार नाही ह्याची खात्री झाल्यावर ते घरी परत यायला निघालेत.
–तिकडे सायली घरी नसल्यामुळे सुजयची आणि तिची भेट होऊ शकत नाही. ईशाला तो काही प्रश्न विचारतो, पण ईशा हुशारीने वेळ मारून नेते आणि त्यामुळे सायलीच्या घरच्यांना खरंच संशय आलाय का ह्याचा नीटसा अंदाज त्याला येऊ शकत नाही.
–सुजय येऊन गेल्यावर माई आजी आणि ईशा ह्यांच्यात ‘अंधारातल्या सावल्या’ ह्या विषयावर काही बोलणं होतं. माई आजी ह्याबद्दलचा तिचा अनुभव ईशाला सांगते..त्याचवेळी सिद्धार्थ घरी येतो..त्याच्याबरोबर आहे, एक अनोळखी मुलगी आणि तिच्याच वयाचा एक मुलगा.
आता पुढे —-
*****************************************
टॅक्सीत बसल्यावर दोन मिनिटं कोणी काहीच बोललं नाही. शेवटी ती शांतता सहन न होऊन आईच म्हणाली,
“मला खरंच वाटत नाहीये हो, आपल्या बाबतीत, सायलीच्या लग्नाच्या बाबतीत हे असं झालंय. तो सुजय, काय डोकं गहाण ठेवलं होतं की काय त्याने, त्याला मदत करताना? स्वतःच्या डोळ्यादेखत अशी स्वतःची ओळख कुणी वापरतंय हे चाललं तरी कसं त्याला? मी कितीही त्याच्या बाजूने विचार केला ना, तरी त्याची बाजू मला समजण्यापलीकडची आहे…”
“आई, जाऊदे ना आता…किती वेळ ह्या सगळ्याचा विचार करून त्रास करून घेणार आहेस? त्याने सांगितलं ना आपल्याला, तो कोणत्या दडपणाखाली होता हे सगळं करताना….त्याच्या आई वडिलांसाठी वाईट वाटलं मला…त्यांच्यासाठी हे सगळं नक्कीच शॉकिंग होतं..” सायली
“खरं आहे, साधी लोकं आहेत ती, अगदी आपल्यासारखी…त्याच्या तोंडून हे सगळं ऐकताना त्यांना किती त्रास झाला असेल मी समजू शकतो…पण वसू…..मिस्टर आणि मिसेस सान्यांना भेटून आपण किती योग्य पाऊल उचललं ते तुला कळलं का? आपण त्या सुजयशी लग्नाला नकार देऊन ह्यातून सहज बाहेर पडलो असतो, पण साने मंडळी ह्या सगळ्या प्रकारात अंधारातच राहिले असते. त्यांना हे कळणं अतिशय महत्वाचं होतं आणि मग ते दडपण त्यांच्या मुलावर येणंही तितकंच महत्वाचं होतं. नाहीतर आजही तो त्या खोट्या सुजयला साथ देत बसला असता, ह्या सगळ्यात आणखी गुरफटत गेला असता…त्याच्यामुळे सायलीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं हे जरी खरं असलं, तरी त्यात त्याचंही नुकसानच होतं हेसुद्धा खरं आहे…उद्या ह्या सगळ्यामुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता तर त्या बिचाऱ्या आई–वडिलांनी काय केलं असतं? आज आपण त्यांच्यासमोर हे सगळं उघड केलं त्यामुळे दोन चांगल्या गोष्टी झाल्या— एक म्हणजे, आता सुजय ह्यात पडणार नाही आणि त्याच्याकडून कोणतीही मदत त्या खोट्या सुजयला होणार नाही…आणि दुसरं म्हणजे, एका चांगल्या घरातल्या मुलाला वेळीच सावरल्याचं समाधान मिळालं आपल्याला… त्यामुळे आता तणतण करू नकोस..त्या सुजयला माफ करून पुढे जाऊया आपण….”
“आणि आई, ज्याने हे सगळं प्लॅन केलं तो सुजय अजून लग्नाची स्वप्नं रंगवत असेल…त्याला कसं सरळ करायचं, स्वतःच्या तोंडाने सगळं कसं कबूल करायला लावायचं सगळं ह्याचा विचार केला पाहिजे आत्ता..सिद्धार्थ काल रात्री परत निघणार होता, आत्ता आलाही असेल मुंबईला..पण काल त्याच्याशी बोलले तेव्हा तो त्या कोमलच्या घरापर्यंत पोहोचला होता..पण घर बंद होतं…त्याने त्याच्यापरीने सगळे सोर्सेस ट्राय केले, पण परत निघायची वेळ झाली होती आणि तिचं घर बंद असल्यामुळे तिथे त्याला काही कळणं शक्यच नव्हतं…आता आपल्याला आपल्याकडे असलेल्या माहितीच्या जोरावर ह्या सुजयला ट्रॅप करायला हवं…तो स्वतःच्या तोंडून सगळं कसं कबूल करेल हेच बघायला लागेल आता…”
“मग सिद्धार्थला फोन करून बघ ना…तो आला असेल तर त्याच्याशी बोलता येईल ह्याबद्दल…” बाबा
“मी पण असा विचार केला थोड्या वेळापूर्वी…पण म्हटलं तो सकाळी येऊन आत्ता कुठे घरी पोहोचला असेल, आणि तसंही त्याला आणखी काही कळलं असण्याची शक्यता नाहीच आहे…म्हटलं थोड्या वेळाने फोन करेन…त्याला तयारी करून ऑफिसला सुद्धा जायचं असेल, कालपर्यंतच रजा होती त्याची…”
“काही म्हणा, पण त्याची खूप मदत झाली ह्या सगळ्यात…असं कोण तिथे जाऊन राहून ही माहिती काढू शकलं असतं आपल्यासाठी नाहीतर?” बाबा
“तसं माझी आणि ईशाची जायची तयारी होती पण घरी काय सांगून जाणार, तेसुद्धा एवढ्या लांब…ह्या विचारात ते मागे पडलं आणि मग सिद्धार्थ डायरेक्ट गेलाच तिकडे……” सायली हळूच म्हणाली.
“घ्या म्हणजे हे सुद्धा करायची तयारी होती ह्यांची…नशीब माझं गेला नाहीत दोघी तिकडे….पण हे सगळं एकदाचं निस्तरलं ना की सिद्धार्थला घरी बोलवूया आपण जेवायला, त्याला थँक्स म्हटलंच पाहिजे…” आई
“ते करू गं…त्या आधीसुद्धा बरंच काही करायचंय अजून…त्याबद्दल काही बोलतच नाहीयेस तू…” सायली
“मी म्हटलं तुला सरळ त्या सुजयला घरी बोलवून खरं–खोटं काय ते विचारायचं, तुम्हाला पटत नाही ते…मी काय करू मग?” आई
“इथून राईट्ला घ्या आणि मग आत सरळ….” बाबा टॅक्सीवाल्याशी बोलून मग मागे वळत म्हणाले, ” आता जाऊदे ना..पोहोचतोच आहोत ना घरी आता…आता घरी जाऊन मगच विचार करू काय करायचं त्याचा…
पण सायलीचं लक्षच नव्हतं. आता पुढे काय करायचं हेच तिच्या डोक्यात घोळत होतं.
दोन मिनिटांनी टॅक्सीतून उतरून घराच्या दिशेने ते तिघे चालायला लागले तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती ती त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याच घरात त्यांची वाट बघत आहेत.
——————————————
“सुजयसे सबसे पेहेले इंदौरके सराफा बझार मैं हम मिले, तब…..”
“तब जो हुआ था, वो सब कुछ बताईये प्लिज…” ईशा मधेच तिला तोडत म्हणाली.
“ईशा, सांगतेय ना अगं ती…जरा थांब…” सिद्धार्थ
“हो , माहित आहे, तू आणलं आहेस तिला..एवढं लगेच शिकवायला नकोय मला..” ईशा
“बायो काय चाललंय गो तुझं? ही वेळ आहे काय भांडायची? सिद्धार्थ, त्यांना सांग बरं, म्हणावं आधी चहा घ्या, खाऊन घ्या आणि मग बोलू…तूसुद्धा खाऊन घे शांतपणे…..रात्रभर प्रवास झालाय हो…नंतर बोलू बरं…” माई आजी
“अगं पण खाता–खाता बोलता येतं की नाही? एवढं काय?” ईशा
“काही गोष्टी, त्या आठवणी नकोशा वाटणाऱ्या असतील तर त्यांचा उल्लेख झाला तरी मन उदास होतं हो, आणि मग जेवणात –खाण्यात कशातच लक्ष लागत नाही…म्हणून म्हटलं आधी खाऊन घेऊदे त्यांना…” माई आजी
“क्या हुआ सिद्धार्थजी? हम कुछ कम–ज्यादा तो नही बोल गये?”
“अरे नही जी बिलकुल नही….दादीजी बोल रही है की आप लोग थके हुए रहेंगे…पेहेले थोडा खा लो, फिर बात करेंगे…” सिद्धार्थ
सिद्धार्थच्या ह्या बोलण्यावर ती एकदम गंभीर झाली…
“ऐसे नही है जी दादीजी, जीस बारेमे बात करने हम यहा आये है ना, वो बात, हमारे जिंदगी की सबसे बुरी यादे है, ऐसी बात जो हम हमारे जिंदगीसे अलग नही कर सकते और जिंदगीभर उसको सिर्फ एक दर्द की तरह सेहेन करना अब हमारी नसीब मैं रह गया है….”
बोलता–बोलता तिचे डोळे पाण्याने भरूनच आले एकदम. तिच्या बरोबरच्या त्या मुलाने एकदम पुढे होऊन तिच्या पाठीवर थोपटलं…थोडं शांत होऊन ती पुढे म्हणाली,
“खाना रेहेने दिजीये दादीजी…मैं जो कुछ केहेने यहा आयी हू, वो सब कुछ एक तुफानकी तरह हमारी दिमाग मैं चल रहा है, जबसे सिद्धार्थजी मिले हमें….इस सबमे खाना कैसे जायेगा….वो सब दर्द आज आप लोगोंसे बाटने आयी हू मैं…मैने तो बिलकुल आशा छोड दी थी, की इस सबमे मेरी साथ देने कोई आ जायेगा..कितनी बार थँक्स कहू आप लोगोसे?”
तिच्या बोलण्यावर लगेचच कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. खरंच ह्या स्टोरी मध्ये पुढे काय झालं होतं ह्याचा ना सिद्धार्थला अंदाज होता ना ईशाला. तिच्या बोलण्यावरून तसा काहीच अंदाज येत नव्हता. एक मिनिटानंतर शेवटी ईशा उठली आणि तिने पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला…
“अक्चुअली थँक्स तो हमें आपका करना चाहिये…जिस बात को जानने के लिये मैं, सायली और सिद्धार्थ इतने दिनोसे कोशिश कर रहे है, वो बात आज आपके वजहसे हमें पता चलेगी….. आपने यहा आनेकी कोई तैय्यारी भी नही की थी, फिर भी बिना कुछ सोचे आप सिद्धार्थके साथ यहा आई …नही तो शायद हम लोग इस राज तक कभी आके नही पहुचते….सो थँक्स टू यु …..”
“ये एक ऐसी बात है ना ईशाजी, जिसकी वजहसे रातको चैनकी निंद नही सो सकते हम…पुरानी यादे, अपने सबसे करीबी लोगोकेसाथ बीताया हुआ वक्त, दिलको तकलीफ देनेवाली वो सारी भयानकसी बाते जो आज भी सच नही लगती….ऐसी बहोत सारी भावनाये चलती है दिमागमे…”
ईशा आणि सिद्धार्थने एकमेकांकडे बघितलं..नक्की काय म्हणायचंय हिला? एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली,
लेकिन सबसे बडी भावना क्या है हमारी पता है? बदले की..हम बदला लेना चाहते है उस सुजयसे…इसलिये तो कल शाम जब पडोसवाली चाचीसे पता चला की सिद्धार्थजी आये थे और कुछ पूछताछ कर रहे थे और रातको मुंबई वापस जायेंगे तब हम दौडके गये स्टेशनपर…..अच्छा हुआ की वो अपना नंबरभी छोड गये थे चाची के यहा…स्टेशनपे मिलके सब कुछ बाते करने के लिये वक्त भी नही था…ट्रेन छुटनेही वाली थी…हमें ऊनसे मिलके बस इतना पता चला की वो किस बारेमे बात करना चाहते थे…बस तभी स्टेशनपे ही हमने फैसला कर लिया…सिद्धार्थजीके साथ ऊसी ट्रेनमे बैठके मुंबई जायेंगे…आगे क्या होगा किसने देखा है…. फोनपर बात नही हुई तो ? फिरसे मिलही नही सके तो ?..मुझे एक भी चान्स नही लेना था…”
“खरं आहे ती म्हणतेय ते…आमचं रात्रभरात बोलणं होऊ शकलं असतं पण ट्रेन अगदी फुल्ल होती…माझं रिझर्वेशन होतं आणि त्यांनी आयत्या वेळेला तिकीट काढलं होतं …वेगवेगळ्या बोगीत जागा मिळाली होती..रात्रभर झोपू नही शकलो मी …जे गेले काही दिवस वेड्यासारखं शोधतोय ते हिच्या रूपाने अगदी दरवाजासमोर येऊन उभं राहिलंय पण दरवाजाच उघडता येत नाहीये असं काहीसं झालं होतं….पहाटेनंतर त्यांना फोन केला…म्हटलं माझ्या बोगीत बरेच बर्थ रिकामे झालेत…. तुम्ही इथे या म्हणजे जरा बोलता येईल…मग तेव्हा खरं तर नीट भेटलो आम्ही. त्यांना सायलीबद्दल, तिच्या आणि सुजयच्या ठरलॆल्या लग्नाबद्दल, सायलीला होणारे भास, त्यातून आपण सुरु केलेला शोध, सगळं सांगितलं …सगळं सांगून होईपर्यंत आलोच आम्ही मुंबईला …म्हटलं आता सायलीला भेटूनच सगळं ऐकायचं ह्यांच्याकडून …म्हणून ह्यांना इथेच घेऊ आलो डायरेक्ट ..”
“हम्म….आपण सायलीला फोन करून बघूया का कुठे आलेत ते? एक मिनिट…मी लावतेच फोन…” ईशाने मोबाईल हातात घेतला तेवढ्यात बेल वाजली…
“सायलीच आली कदाचित…”
ईशाने धावत जाऊन दार उघडलं. समोर उभ्या असलेल्या मध्यमवयीन जोडप्याला बघून ती संभ्रमात पडली.
“कोण आपण?”
“नमस्कार. सायली देशपांडे इथेच राहतात ना ? त्यांनाच भेटायला आलोय आम्ही….”
“हो…हे सायलीचंच घर…या ना आत…”
ईशा थोडीशी गोंधळात पडली होती. आज नक्की काय चाललंय हे? सकाळी सकाळी नवीन लोकं घरी येतायत….मगाशी तो सुजय येऊन गेला…आज काहीतरी होणार आहे निश्चित…
ते नवरा–बायको आत आले…समोर बसलेल्या माई आजीकडे बघून त्यांनी हात जोडून नमस्कार केला..
“नमस्कार….” त्या बाई म्हणाल्या..
“नमस्कार…कोण आपण? ईशा, बायो तू ओळखतेस का ह्यांना? माफ करा हा, काय झालंय वयामुळे काही गोष्टी पटकन लक्षात नाही येत माझ्या हो…”
ईशा काही बोलायला जाणार तेवढ्यात ते काका म्हणाले,
“आजी, खरं तर ह्या घरातले कोणीच आम्हाला ओळखत नसणार, पण तुमच्याकडे, म्हणजे खरं तर सायलीकडे तसंच काही काम निघालं म्हणून आलो आम्ही…..सायली आहे का?”
“ती नाहीये आत्ता घरात…पण येतच असेल आता…बसा ना तुम्ही..मी पाणी आणते हा…” ईशा
“आपलं काय नाव? कुठे असता बरं आपण?” माई आजी
त्यांच्या उत्तर कानावर पडलं तशी पाणी आणायला आत जायला निघालेली ईशा थबकली आणि मग तशीच मागे वळली..
“मी नारायण साने आणि ही माझी वाईफ, लक्ष्मी साने….आम्ही सुजयचे काका– काकू आहोत…”
——————————————
“हॅलो…” फोन उचलला गेला तसा सुजय सावरून बसला. थोड्या वेळापूर्वीच तो सायलीच्या घरातून बाहेर पडला होता. तिच्या घरी लग्नाची तयारी कशी चालली आहे, तिच्या घरच्यांना काही संशय आलाय का ह्याचा अंदाज घ्यायला तो गेला होता..पण सायली आणि तिचे आई-बाबा तर भेटलेच नव्हते…ईशा बोलताना म्हणाली होती की सायली लग्नाच्या खरेदीला गेली आहे, आणि तसं तिच्या बोलण्यातून तिला संशय आल्यासारखं वाटलं तर नव्हतं…पण तरी काही प्रश्न वेड्यासारखे भेडसावत होते…आईकडून सायली घरी आल्याचं कळलं ते कसं काय? की दुसरीच कोणी घरी येऊन गेली आणि सायलीचा फोटो पाठवल्यावर आईचा गोंधळ झाला असेल का? त्या टेलरच्या रिसीटचं काय? आणखी कोणाला विचारून आपल्या शंकेबद्दल खात्री करून घेता येईल?…..शेवटी विचार करून त्याला एक नाव सुचलं…पण फोन करावा का? आता ….इतक्या महिन्यानंतर …..? असुदे…आता आपलं काम तर आहे, म्हणजे तिच्याशी बोलायलाच हव…..
“हॅलो योगिता,….सुजय बोलतोय..”
“मला माहित आहे ते..आत्ताही फोन उचलणारच नव्हते पण एकदा शेवटचं बोलून टाकूया म्हणून फोन घेतला …. तुला कळत नाहीये का, मला बोलायचं नाहीये तुझ्याशी ते…आणि आता सगळं संपलंय ना..आपलं लग्न मोडलं तेव्हाच आपला संबंध संपला..आता कशाला फोन करतोयस?”
“मला त्याबद्दल बोलायचं नाहीये तुझ्याशी योगिता, माझ्याशी लग्न कर म्हणून मी मागे लागणार नाहीये…माझं जरा वेगळं काम होतं..” सुजय
“कसलं वेगळं काम ?” योगिता
“आत्ता एवढ्यात सायली नावाची कोणी मुलगी तुला भेटली का? माझ्याबद्दल काही विचारत होती का असं मला विचारायचं होतं तुला…” सुजय
योगिता एक क्षणभरासाठी विचारात पडली. पण अर्थात, सायली तिला भेटली हे ती त्याला सांगणार नव्हतीच..
“कोण सायली? ”
“अगं सायली नाहीतर आणखी वेगळं काहीतरी नाव सांगितलं असेल तिने तुला, पण माझ्याबद्दल विचारायला कोणी आलं होतं का तुला?”
“नाही, असं कोणीही आलं नव्हतं. पण असं कोणी माझ्याकडे येईलच का? माझा काय संबंध आहे आता तुझ्याशी?”
“प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस, पण एक मुलगी माझ्या घरी येऊन गेली आणि आईला काहीतरी खोटं सांगून गेली. मला शोधून काढायचंय तिचं नक्की काय चाललंय ते…तिने आईशी बोलताना तुझा उल्लेख केला म्हणून तुला फोन करून विचारावंसं वाटलं..”
“आपलं लग्न ठरलं होतं सुजय, हे तिला माहित असेल म्हणून म्हणाली असेल तसं, पण मला कोणीही येऊन तुझ्याबद्दल काहीही विचारलेलं नाहीये…आणि लग्न मोडलं त्या दिवसापासून मी ह्या विषयावर काय अगदी तुझ्याबद्दलही कोणाकडे काहीही बोललेले नाहीये…फोन ठेवतेय मी आणि परत कोणत्याही कारणाने मला फोन नाही केलास तर बरं होईल.”
फोन ठेवल्यावर एक क्षणभर योगिताने विचार केला आणि मग फोनवरून सायलीला एक मेसेज टाईप केला.
हाय सायली, जस्ट टू इन्फॉर्म यु…सुजयने आत्ताचं मला कॉल केला होता…सायली नावाची कोणी मुलगी माझ्याबद्दल तुझ्याकडे चौकशी करत होती का असं विचारत होता…बी केअरफूल…त्याला संशय आलेला दिसतोय..
पलीकडून कॉल एन्ड झाल्याचा आवाज आला तरी सुजयने अजून मोबाईल कानालाच लावलेला होता….हा काय गोंधळ चाललाय सगळा? सायली घरी येऊन गेली होती म्हणावं तर ती माझ्या घरापर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न पडतो आणि ती आली नव्हती असं म्हणावं तर मग ती टेलरची रिसीट घरात कशी आली हा प्रश्न सतावतो…काय करावं आता? कसं शोधून काढायचं हे? सायलीला खरंच काही सुगावा लागला असेल का हे कसं कळणार? तिच्याकडून काढायला गेलो आणि तिला खरंच काही माहित नसेल तर एवढा सगळा जुळून येत असलेला प्लॅन आपल्या मुर्खपणामुळे उधळला गेला असं होईल….नीट विचार केला पाहिजे, ह्या कोड्याचं उत्तर नक्की मिळणार आपल्याला…..आता भानावर येऊन त्याने मोबाईल खाली ठेवला. दोन मिनिटांनी विचार करून पुन्हा एकदा मोबाईल हातात घेऊन एक नंबर डायल केला.
———————————————–
सायली आणि आई–बाबा घरी पोहोचले. घरी त्यांची वाट बघत असलेली सगळी अनोळखी मंडळी त्यांच्या समोर आली आणि त्याचबरोबर समोर आलं पडद्याआड गेलेलं एक सत्य–
सायली घरात येताच ईशा तिच्याकडे धावली…
“सायले, आलात तुम्ही? कधीपासून तुमची वाट बघतायत सगळे…”
सायली अजून गोंधळून घरात जमलेल्या त्या सगळ्यांकडे बघत होती. समोर बसलेल्या त्या जोडप्याकडे बघून त्यांना कधीतरी, कुठेतरी बघितलंय का असं तिला वाटून गेलं पण नक्की काही आठवेना. बाजूला कोपऱ्यात एक मुलगी आणि एक साधारण तिच्याच वयाचा एक मुलगा उभे होते, त्यांच्या कपड्यांवरून ते मराठी तर वाटत नव्हते.
“ईशा, हे काय …आय मिन हे कोण आहेत सगळे ?” सायली कुजबुजत म्हणाली..
“नमस्कार, ” समोरच्या जोडप्यातल्या त्या बाई उठल्या. सायलीच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्यांनी वाचले होतेच. “तुम्ही कोणीच आम्हाला ओळखत नाही, आणि खरं तर आम्हालाही तुझ्याबद्दल सगळं कालच कळलंय पण राहवलं नाही म्हणून आज सकाळी लगेच पुण्यावरून इथे आलो…आम्ही सुजयचे काका–काकू, सौ लक्ष्मी आणि हे श्री नारायण साने..”
त्यांचे शब्द ऐकून सायलीच्या छातीत धडधडलं. सुजयचे काका–काकू इथे कसे? आपण त्यांना भेटायला गेल्याचं त्यांच्या बिल्डिंगच्या वॉचमनकडून ह्यांना कळलं की काय? पण…वॉचमनला आपण आपलं नाव, पत्ता थोडंच दिलं होतं? आणि हे इथे आपल्या घरी आलेत म्हणजे, सुजयला सुद्धा हे माहित आहे? त्याला काही कळू न देता आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढायची होती, त्यासाठी सगळी धडपड चालली होती…पण त्याला हे कसं कळलं असेल? तिच्या डोक्यात प्रश्नांची मालिकाच सुरु झाली.
“नमस्कार…बसा ना आपण..” बाबा त्या बाईंना म्हणाले. “पण …तुम्ही…म्हणजे …इथे कसे? सुजयकडून …”
“नाही नाही…” बाबांना मधेच तोडत ते गृहस्थ म्हणाले, ” आणि सगळ्यात आधी आम्ही आपली माफी मागतो, आपल्या आधी कसलीही पूर्वसूचना न देता आम्ही आलो त्याबद्दल…पण योगिताकडून आम्हाला जे कळलं ते इतकं धक्कादायक होतं…”
“योगिताकडून? म्हणजे ?” सायली
“सांगतो…पण आधी सायलीला विचारून एका गोष्टीची खात्री करायची आहे….आत्ता अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वी एक सेल्सगर्ल बनून तू सुजयच्या घरी येऊन त्याच्या आईला भेटलीस, बरोबर ना?”
हे ऐकल्यावर सायली त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली…..तिने बाबांकडे बघितलं..
“मिस्टर साने, तुम्ही माझ्या मुलीला जाब विचारायला आला असाल, तर आधी आमची बाजू ऐकून घ्यावी लागेल तुम्हाला…” बाबा
“मिस्टर देशपांडे, तुमचा गैरसमज होतोय…मी जाब विचारायला नाही आलोय, खरं तर तुमची बाजूच ऐकायला आलोय, पण आमच्यापर्यंत हे सगळं ज्या गोष्टीमुळे आलं, म्हणजे सायलीच्या आमच्या वहिनींना भेटण्यामुळे, त्याची एकदा खात्री करून घ्यायची होती, म्हणून मी तिला तसं विचारलं. सॉरी तुमचं काही मिस–अंडरस्टॅण्डिंग झालं असेल तर…..आता सांगतोच. काय झालं, काल सुजयचा फोन आला होता वहिनींना… तो पुण्याला आला होता तेव्हा त्याला म्हणे एक टेलरची रिसीट सापडली घरात ज्यावर सायलीचं आडनाव आणि त्या मुंबईच्या टेलरचा पत्ता होता त्यावरून त्याला संशय आला. त्याने वहिनींना सायलीचा फोटो पाठवला मोबाईलवर आणि विचारलं की हीच मुलगी सेल्सगर्ल म्हणून आली होती का…त्यावर वाहिनी खोटं नाही बोलू शकल्या त्याच्याशी..त्याने त्यांना सांगितलं की ही मुलगी माझ्या वाईटावर आहे, माझं लग्न ठरलं की त्यात अडथळे आणणार असं काहीतरी…पण त्यावर वहिनींनी त्याला काही प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं तो नाही देऊ शकला. त्या फार अस्वस्थ होत्या काल आणि मग न राहवून त्यांनी आम्हाला दोघांना हे सांगितलं… काहीतरी गडबड आहे हे आम्हाला जाणवलं. वहिनींनी सांगितलेल्या माहितीत योगिताचा उल्लेख होता म्हणून काल रात्री मी तिला फोन केला आणि मग तिच्याकडून सायलीबद्दल सगळं समजलं. सायलीचं आणि सुजयचं लग्न ठरलंय हे ऐकून आम्हाला जबरदस्त धक्का बसला. कसंबसं सावरून आम्ही निर्णय घेतला आजच्या आज सायलीला येऊन भेटण्याचा…हा काय प्रकार आहे हे कळल्याशिवाय झोप लागणंही शक्य नव्हतं. वहिनींना मात्र आम्ही अंधारात ठेवलंय ह्याबद्दल…आधी आपण जाऊन नीट माहिती काढू म्हणून आलो….योगिताकडे सायलीचा फक्त नंबरच होता. तिला रिक्वेस्ट करून तुमचा पत्ता मिळवला. ”
“हो तरीच सकाळी एवढ्या लवकर योगिताचा मेसेज बघून मलाही आश्चर्य वाटलं होतं, तिने माझा पत्ता मागितला होता.. पण आपणही घाईत होतो ना, मी एवढा विचार नाही केला त्यावर…मला वाटून गेलं की कदाचित ती इकडे येणार असेल तर तिचा घरी भेटायला येण्याचा प्लॅन असेल आणि नंतर तिला फोन करू म्हणून मी ते सोडूनही दिलं…” सायलीला आता आठवलं.
“पण सुजय तुमचा पुतण्या आहे, तुम्ही त्याला ह्याबद्दल का नाही विचारलंत? सायलीसारख्या अनोळख्या मुलीशी ह्यावर बोलण्याआधी त्याच्याशी बोलून त्याची बाजू जाणून घ्यावी असं नाही का वाटलं तुम्हाला?” आई
“खरं आहे तुमचं…खरं तर एरव्ही असंच करेल कोणीही..पण सुजयच्या बाबतीत त्याच्यावर आम्ही असं डोळे झाकून विश्वास ठेवू शकू असं आम्हाला नाही वाटत…म्हणजे तो खोटारडा आहे असं नाही…पण गेल्या एक–दीड वर्षात तो इतकं बदलून गेलाय की ह्याआधी आम्ही बघितला तो सुजय हाच आहे का असा प्रश्न पडतो आता…त्याच्याबद्दल आणखीही काही कळलं होतं आम्हाला ..त्यामुळे ह्याबाबतीत त्याला काही विचारणं आम्हाला पटलं नाही…” सुजयचे काका
“म्हणजे? काय कळलंय तुम्हाला त्याच्याबद्दल?” सायली
“दीडेक वर्षांपूर्वी तो मित्रांबरोबर मध्य प्रदेशला गेला होता, त्याच्या एका मित्राच्या लग्नासाठी..लग्न आटोपल्यावर पुढे दोन आठवडे तिकडे राहून सगळे ट्रेक ला वगैरे जाणार होते…सगळं मिळून तीन आठवड्यांसाठी गेला होता तो. ठरलेल्या दिवसाच्या आधीच तीन-चार दिवस काहीही न कळवता अचानक घरी परत आला. तिथून आल्यावर त्याच्या मित्राला त्याने तिथे काय झालं हे सांगितलं होतं. प्रशांत म्हणून त्याचा खूप जवळचा मित्र होता, अगदी लहानपणापासूनचा…सुजयमध्ये झालेले बदल तो सुजय परत आल्यावर भेटला, तेव्हा पहिल्याच भेटीत जाणवले त्याला…त्याने अगदी खोदून, खोदून विचारलं त्याला..कोणालाही सांगणार नाही असं प्रॉमिस केलं, तेव्हा सुजयने थोडं–फार सांगितलं त्याला. मध्य प्रदेशात म्हणे तो कुठल्याशा गावात गेला होता आणि तिथे जाऊन तो एका मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाचं प्रॉमिस केलं आणि मग अचानक तिथून पळून आला... प्रशांतने हे कळल्यावर मला आधी फोन केला. वहिनींना हे सांगण्यापेक्षा मला माहित असलेलं बरं म्हणून… आम्हाला अर्थातच मोठा धक्का बसला. प्रशांत त्याच दिवशी संध्याकाळी घरी येऊन सविस्तर सगळं बोलणार होता माझ्याशी…पण त्याला काही काम आलं आणि तो आला नाही…दोन दिवसांनी येणार होता पण त्याआधीच ऍक्सिडंट मध्ये गेला बिचारा…फोनवर त्याच्याकडून जे कळलं तेवढंच आजपर्यंत मला माहित आहे..सुजयशी बोलायची खूप इच्छा झाली होती, पण नाही जमलं.खरं तर त्याच्याशी मी बोलायला हवं होतं. घरातला मोठा म्हणून, त्याचा काका म्हणून…पण खरंच सांगतो, त्याच्या बदललेल्या स्वभावाची भीती वाटते आता मला….वहिनींनी त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि आम्ही ह्या विषयाला आमच्यापुरतं तरी तिथेच थांबवायचं ठरवलं. सुजयचा संसार नीट सुरु करून द्यायचा आणि वहिनींना ह्यात सर्वतोपरी मदत करायची असं आम्ही ठरवलं…”
थोडं थांबून त्यांनी समोरच्या तांब्यातलं पाणी प्यायलं.
“सॉरी हा, बोलण्याच्या नादात तुम्हाला पाणीसुद्धा नाही विचारलं. “आईला जरा ओशाळल्यासारखं झालं. “ईशा पाणी आण जरा, आणि चहा सुद्धा टाकतेस का सगळ्यांसाठी?”
“अहो नाही, ठीक आहे…चहा वगैरे नको आम्हाला..” त्या बाई म्हणाल्या.
“नाही, असं कसं? सकाळी पुण्याहून निघून आलायत तुम्ही…” आई
“हो, पण आम्हाला फार वेळ नाही थांबता येणार…वाहिनी एकट्या आहेत ना..परवा चक्कर येऊन पडल्या त्या…त्यामुळे आम्ही आठवडाभर त्यांच्याकडे राहतोय..पण काल हे सगळं कळलं आणि अगदीच राहवलं नाही…एरव्ही खरं काय झालं ते कळण्याची आशाच सोडून दिली होती आम्ही…” काकू
“पण मग पुढे काय झालं?” बाबांनी कुतूहलाने विचारलं, “आणि गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही इतक्या सहज हे प्रकरण सोडून कसं दिलंत? इतक्या थोड्या दिवसात तो एका अनोळखी, आपल्यापेक्षा थोडी वेगळी बॅकग्राउंड असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाचं प्रॉमिस करून मग अचानक पळून आला…त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तरी तुम्ही ह्यात लक्ष घालायलाच हवं होतं ना…”
“बरोबर आहे तुमचं. पण मी माझ्या परीने प्रयत्न केला…. प्रशांतला मी सांगितलं होतं की भेटायला येताना जमलं तर त्या मुलीची माहिती, पत्ता, फोन नंबर काहीतरी घेऊन ये…सुजयला सरळ विचारू नकोस पण जमेल तसं काढून आण त्याच्याकडून…त्याच्याशी भेट तर नाही झाली, पण तो गेला त्याच्या आदल्याच दिवशी त्याने एक फोन नंबर पाठवला होता मला. उद्या येतो आणि मग सविस्तर बोलू असंही लिहिलं होतं. ..त्याच्याकडून पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्या नंबरवर मी फोन करणारच नव्हतो. पण नंतर दुर्दैवाने तो गेला आणि मला समोरून कोणी माहिती देईल असं कोणी राहिलंच नाही. सुजयशी सुद्धा एक-दोन वेळा बोलण्याचा प्रयत्न केला…पण तो तिथून आल्यापासून भयंकर विक्षिप्तपणे वागायला लागला होता…त्याला बोलायचं नसेल की तो सरळ उठून काहीही न बोलता बाहेर निघून जायचा…मलाही त्याने असंच टाळलं…शेवटी एकदा मी धीर करून त्या नंबरवर फोन केला. प्रजापती म्हणून एका गृहस्थाचा नंबर होता तो. ”
“प्रजापती? म्हणजे कोमलचे मामा?” सायली एकदम ओरडलीच.
“कोमल? कोण कोमल? तू ओळखतेस तिला?” काका
सिद्धार्थ आणि त्याच्या बरोबर कटनीवरून आलेल्या त्या मुलीची नजरानजर झाली.
“मी सांगतो नंतर तुम्हाला. पण मग काय म्हणाले ते प्रजापती?” बाबा
“त्यांचा आणि त्या मुलीचा काय संबंध आहे ते जाणून घ्यायचं, सुजयने प्रशांतला लग्नाबद्दल जे सांगितलं त्यात काही तथ्य आहे का त्याचा अंदाज घायचा, तसं असेल तर त्यांची माफी मागायची आणि सुजय तिथे असताना नक्की तिथे काय झालं, ह्याबद्दल त्यांच्याशी बोलायचं असं मी फोन करताना ठरवलं होतं. पण ते प्रजापती फोनवर सुजयचं नाव ऐकताच इतके भडकले होते, काहीच ऐकून घेतलं नाही माझं. उलट, आयुष्यात इतक्या वाईट पद्धतीने कोणी बोललं नसेल माझ्याशी, अशा प्रकारे बोलत होते. त्या मुलीचा विषय काढला तर ते काही बोलायलाच तयार होईनात. आणि नंतर ‘वो सुजय इस सबकी सजा भुगतेगा…’ असं काही, काही बोलून त्यांनी फोन आदळला. नंतर एकदा पुन्हा प्रयत्न केला मी त्यांच्याशी बोलण्याचा, पण त्याहीवेळेला असंच झालं. आणि त्याच सुमाराला वहिनींनी सुजयला स्थळं बघण्याची मोहीम जोरात हातात घेतली, मग आम्ही त्यात त्यांना पूर्ण मदत करायची ठरवलं.”
“तुम्हाला काय वाटतं काका, खरंच सुजय असं वागला असेल तिकडे जाऊन?” सायली
“म्हणजे? त्यानेच प्रशांतला सांगितलं ना तसं? ” काका जरासे गोंधळले.
“तसं नाही, म्हणजे एवढ्या दिवसांच्या अनुभवावरून सुजय त्या मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाबद्दल विचारलं किंवा प्रॉमिस केलं आणि मग तिथून पळून आला, एवढं हे साधं वाटत नाही, नक्की काहीतरी वेगळं किंवा ह्यापेक्षा काहीतरी जास्त झालं असणार, नक्कीच….तुला काय वाटतं सिद्धार्थ ?”
सायलीने सिद्धार्थला विचारलं आणि मग तिचं सिद्धार्थच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या दोघांकडे लक्ष गेलं. मगाशी घरात आल्यावर तिने त्यांना बघितलं होतं, पण मग सुजयच्या काका–काकुंशी बोलताना ती त्यांना पूर्ण विसरून गेली होती. आता त्यांना बघून तिच्या मनात पुन्हा प्रश्नांची मालिका सुरु झाली.
“सिद्धार्थ, हे कोण आहेत?” तिने थोड्या हळू आवाजात विचारलं.
“सायली, मला मगाशीच सांगायचं होतं तुला, आय मिन, तुम्हाला सगळ्यांनाच…आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन आली आहे ही… तुला, मला, ह्या काकांना आपल्याला सगळ्यांना जे प्रश्न पडलेत त्याचं उत्तर फक्त ही देऊ शकते आपल्याला …ही …” त्याने त्या मुलीकडे बघत सांगितलं…
“म्हणजे ही……”
सायली त्या मुलीच्या समोर जाऊन तिच्या नजरेत बघत होती. एवढे दिवस जिची त्या एका डायरीतून ओळख होत होती, जिच्या नजरेतून ती सुजयचा भूतकाळ जाणून घेत होती, खरं तर जिच्यामुळे तिच्या आयुष्यात हे अनपेक्षित वळण आलं होतं, ती ही मुलगी होती?
—————————————————
“तो सिद्धार्थ मुंबईला आलाय का ते बघायला सांगितलं होतं तुम्हाला, त्याचं काय झालं?” सुजय
“साहेब आम्ही माहिती काढतोय, पण आज सकाळच्या ट्रेनने आला असेल असं सांगता येत नाही कारण त्याच्या घरी तरी अजून पोहोचलेला नाहीये तो…”
“मग डायरेक्ट ऑफिसला गेलाय का ते बघा, लवकर सांगा काय ते मला…”
“ओ आत्ता सकाळी तुम्ही सांगितल्या सांगितल्या कामाला लागलोय, थोडा वेळ द्या की साहेब…”
“थोडा थोडा करून चार दिवस लावू नका, आज दुपारपर्यंत काय ते कळवा मला..”
——————————————————-
“आपण ना, म्हणजे आपल्या पालकांसोबत राहिलेली साध्या, सरळ घरातली मुलं खूप सेफ जगात वाढलेलो असतो..आमचंही जग असंच होतं…आमच्या आमच्या पुरतं मर्यादित… बाहेरच्या जगाची ओळख होतीच पण तीसुद्धा ठराविक मर्यादेतच.. स्वप्नं बघायचो, खूप स्वप्नं बघायचो…. स्वतःच्या हिमतीवर वर्ल्ड टूर ला जायचं, शाळेतल्या मुलांसाठी एक वेगळी, स्वतंत्र कॉप्युटर लॅब करायची, ह्या सगळ्यासाठी लागणारं जे पैशांचं पाठबळ किंवा जी सांपत्तिक स्थिती असते ती स्वतःच्या मेहनतीवर, हुशारीवर कमवायची…वगैरे असं बरंच काही बोलायचो आम्ही…होणाऱ्या जोडीदाराबद्दल बोलायचो…ते दिवस फार छान होते..आमचं शिक्षण झालं, कॉलेज संपलं आणि मग हळूहळू सगळं बदललं, अर्थात ते प्रत्येकाच्याच बाबतीत बदलत असेल म्हणा..कॉलेजच्या स्वच्छंदी दुनियेतून बाहेर आल्यावर, आत्तापर्यंत बघितलेली स्वप्नं खरी करण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्यातून आलेलं शहाणपण, ह्यामुळे आधीसारखं काहीच राहत नाही, तसंच आमच्याही बाबतीत झालं….बदलली नाही ती एकच गोष्ट…”
(सिद्धार्थबरोबर आलेल्या त्या मुलीबरोबर झालेला संवाद – आपल्या सोयीसाठी अर्थात मराठीतून…)
तिच्या एकेका शब्दाबरोबर हळूहळू तिथे जमलेले सगळेच तिच्याबरोबर भूतकाळात रमायला लागले….ह्या भूतकाळाचा काही भाग तरी आता सगळ्यांच्याच ओळखीचा होता पण अंधारात असलेल्या बऱ्याचशा गोष्टींवर आता प्रकाश पडणार होता.
“कोणती गोष्ट ?” ईशा
ईशाकडे बघून तिने हलकंसं स्माईल केलं..
“ह्या एका गोष्टीबद्दल देवाची शतशः ऋणी आहे मी…..त्याने तिच्यासारखी जिवाभावाची मैत्रीण मला दिली…….कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरही बदलली नाही ती आमच्यातली मैत्री…कोमल आणि छू ह्या दोघींमध्ये तसं बघायला गेलं तर काहीच एकसारखं नाही, ना आमच्या आवडी–निवडी जुळत ना स्वभाव…पण तरीही आमच्यातली मैत्री अजून घट्ट होत गेली दिवसेंदिवस…”
“असणारच…कोमलची डायरी वाचतानाही ते जाणवत होतं आणि तसं नसतं तर सिद्धार्थच्या तिथे येण्याचं नुसतं कारण कळून दुसऱ्या क्षणी त्याच्याबरोबर इथे मुंबईला येऊन आम्हा सगळ्यांना भेटायला तू आली नसतीस, हेही कळतंय छू ..” सायली
“कोमलसाठी मी आलेच असते, कुठेही. त्या सुजयबद्दल सगळं खरं कळणं महत्वाचं…मगाशी सांगितलं तसं आमचं कॉलेज लाईफ खूप रंगीबेरंगी होतं, खरं तर सुजय तिला भेटेपर्यंत तसं सगळंच छान होतं, पण नंतर सगळंच बदललं तिच्यासाठी…..
********************
(ज्या अज्ञाताची इतके दिवस चाहूल लागली होती, सुजयचं जे रहस्य जाणून घेण्यासाठी सायली, सिद्धार्थ आणि ईशा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, ते आता उलगडतंय छू च्या तोंडून……अज्ञाताची ती हुरहूर लावणारी चाहूल, जिच्यामुळे हा शोध सुरु झाला, तो आता संपणार. ह्यापुढे ना विचारांचा गोंधळ असेल, ना भूतकाळाविषयी प्रश्न…. आणि अंधारातल्या सावल्या ?…त्यांचं काय? त्यांच्याभोवती असलेलं गूढतेचं वलय कमी होणार का ?)
********************
कोमलची आणि माझी ओळख अगदी लहानपणापासूनची…अगदी आमच्या आईच्या बोटाला धरून शाळेत गेलो तेव्हापासूनची आमची मैत्री, ओळख त्याच्याही आधी झालेली…आमच्या दोघींच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. खाऊन–पिऊन सुखी पण अचानक एखादा अनपेक्षित खर्च आला की पैसे उभे करावे लागायचे कुठूनतरी. पण दोघींच्या घरचं वातावरण तसं वेगळं. आमच्याकडे तसं नेहेमीचं वातावरण, चार लोकांकडे असतं तसंच. माझे वडील पोस्टात नोकरीला, आई घरीच. आणखी दोन भावंडं..पण कोमलच्या घरी मात्र तसं नव्हतं…ती एकुलती एक त्याच्यामुळे तिचे वडील आणि आई दोघांचं विश्व केवळ ती आणि तीच. त्यांच्या दोघांच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्नं सगळंच तिच्याभोवती विणलं गेलेलं…
मात्र आईच्या आणि वडिलांच्या स्वभाव, विचारांपासून ते आवडी–निवडींपर्यंत काहीच न जुळणारं. म्हणून त्यांची सारखी भांडणं व्हायची असं नाही, त्यांच्यामध्ये प्रेम होतं, आदरही होता म्हणजे निदान चारचौघात ते वावरताना तरी तसं जाणवायचं. पण मतभेद मात्र पुष्कळ व्हायचे.
तिचे वडील अतिशय सात्विक स्वभावाचे, एकदम सज्जन माणूस. उत्तम लेखक..खूप सुंदर लिहायचे..त्यांनी लिहिलेल्या काही कथा वाचल्या होत्या मी, सामाजिक विषयांवर सुद्धा लिखाण केलं होतं त्यांनी. ईश्वरी देणगीच होती त्यांच्याकडे असं म्हटलं तरी चालेल…कटनीमधल्या एका शाळेत शिकवायचे ते..हाडाचा शिक्षक होता तो माणूस. आणि त्यामुळे सतत मुलांच्या भविष्याचेच विचार चालायचे त्यांच्या डोक्यात. शाळेशी ह्या ना त्या कारणाने जोडल्या गेलेल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल बाहेर माहिती मिळत असे, त्यातून त्यांना मोठ्या प्रायव्हेट स्कुलमधून ऑफर्सही यायच्या. पण त्यांना फारशी फी परवडू न शकणाऱ्या, या शाळेत येणाऱ्या मुलांसाठीच काम करायचं होतं. कोमलकडूनही त्यांच्या साधारण अशाच अपेक्षा होत्या…तिने शाळेसाठी काम करता करता स्वतःची एक शिक्षक म्हणून प्रगती करून घ्यावी…पुढे शिकत रहावं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग शाळेतल्या मुलांसाठी आणि समाजातल्या गरजू मुलांसाठी करून माणूस म्हणूनही तिने खूप मोठं व्हावं, असं त्यांना वाटायचं.
तिच्या आईचा स्वभाव मात्र ह्याच्या अगदी विरुद्ध, म्हणजे खरं तर चारचौघांसारखा. कुणाला फसवून वगैरे नव्हे पण आपल्यातली हुशारी वापरून जास्तीत जास्त पुढे गेलं पाहिजे आणि त्यात स्वतःचा आर्थिक फायदाही करून घेतला पाहिजे असं तिचं मत होतं. ती स्वभावाने फटकळ नव्हती पण म्हणून आल्या–गेल्या सगळ्यांशी गोड बोलेल अशी सुद्धा नव्हती. चांगल्याशी चांगली आणि वाईटाशी वाईट, अशी. तिची स्वप्नं बाबूजींच्या स्वप्नापेक्षा खूप वेगळी होती. तिला कोमलसाठी नवीन, मोठ्या घरात जायचं होतं….तिथून दूर अशा थोड्या आणखी चांगल्या लोकॅलिटीमध्ये….तिला चांगल्या घरात राहता यावं म्हणून.. आणि त्यासाठी लागलं तर तिची स्वतःचीही नोकरी करून पैसे कमवायची तयारी होती…पण तिच्या वडिलांचा अर्थातच ह्याला विरोध होता. ..कारण त्यामुळे त्यांच्याप्रमाणे कोमलही शाळेपासून दूर गेली असती. कोमलला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याबद्दल तर ती फार पूर्वीपासूनच आग्रही होती. तिचं स्वप्नच होतं ते, आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं. ती स्वतः फार फार गरिबीतून आलेली होती, तिची शिकण्याची ईच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही, पण म्हणूनच कोमलला खूप शिकवण्याची, चांगलं करिअर, चांगली नोकरी असं सगळं स्वप्न बघत राहायची.
दोघांच्या विरुद्ध स्वभावामुळे बरेचवेळा मतभेद व्हायचे, म्हणजे कोमलकडून मला कळायचं ते. आपापल्या जागी दोघेही बरोबर असायचे पण त्यांचे विचारच इतके विरुद्ध दिशांना जाणारे होते की ठिणगी पडायला तेच पुरेसे असायचे. दरवेळी विषय मात्र वेगवेगळे, एकदा काय, तिच्या वडिलांनी मोठ्या शाळेत जॉईन होण्याची ऑफर नाकारली म्हणून, तर एकदा काय, बरेच दिवसांपासून साठवलेले कोमलला काहीतरी वस्तू घेण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे त्यांनी शाळेतल्या मुलाच्या घरी आर्थिक मदत करण्यासाठी वापरले…असं काही ना काही..
कोमलबद्दल सांगायचं तर अगदी साधी मुलगी ती. दिसायला देखणीच तशी, त्याबाबतीत तिच्या आईवर गेली होती ती. स्वभाव किंवा विचार मात्र वडिलांशी जास्त जुळायचे तिचे…त्यांच्यातली लेखनाची कला तिच्यात पुरेपूर उतरली होती. साधी दोन वाक्य तिने लिहिली, अगदी कोणत्याही विषयावर असोत, त्यातली अलंकारिकता उठून दिसायची, कुणालाही आवडेल आणि ह्या क्षेत्रात असणाऱ्या दिग्गजांनाही भावून जाईल अशी लेखनशैली होती तिची. शाळेत शिकवायची आवडही त्यांच्याच कडून आलेली.
तिच्या अम्मा आणि बाबुजींमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन होती…कोमलवरचं जीवापाड प्रेम. अर्थात, सगळ्याच आई–वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतंच म्हणा, पण त्यांचं मात्र जगच होती ती…त्यांची स्वतःबद्दलची, स्वतःच्या आयुष्याबद्दलची अशी काही वेगळी स्वप्न नव्हतीच…ती सुद्धा कोमलशीच जोडली गेली होती… कोमल मोठी झाली तशी तिच्या उच्च शिक्षणावरून घरात सारखीच चर्चा व्हायला लागली. बाबूजींना तिने इथेच राहून शाळेत नोकरी करून त्याबरोबरीने मास्टर्स करायला हवं होतं…अम्माला मात्र तिने परदेशात जाऊन, तिथे धडपड करून, जमेल तसं काम करून पुढची पदवी मिळवायला हवी होती…एकदा का तिथे डिग्री मिळवली की त्या जोरावर चांगल्या पगाराची एखादी नोकरी तिला कुठेही मिळाली असती…दोघेही आपापल्या मतांवर अगदी ठाम होते..पण अम्माने तर त्यादृष्टीने थोडीफार हालचालही करायला घेतली होती.परदेशात पाठवण्याएवढे पैसे उभे आपण उभे करू शकणार नाही हे माहित होतं तिला मनात कुठेतरी पण तरी बिचारी त्यासाठी प्रयत्न करत राहायची. शिवणकाम करायची, कधी एखाद्या पार्टीसाठी स्वयंपाकाला मदत करायला म्हणून जायची, रोजची ठराविक घरं स्वयंपाकासाठी होतीच, आणखीही असंच जे पडेल ते, मिळेल ते काम घेत राहायची, थोडे थोडे पैसे गाठीला असावेत म्हणून. परिस्थितीमुळे तिचा स्वभाव थोडा तुटक, थोडा फटकळ झाला होता. तिला रागही फार पटकन यायचा. तिच्या इच्छा पूर्ण करण्यात कोमलचे वडील आणि स्वतः कोमल ह्याची फारशी साथ कधी नसायचीच, कोमल तिच्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार हे बघून तिची फार चिडचिड व्हायची, त्या दोघांवरच जास्त. एखाद्या पुस्तकावर त्यांची चर्चा सुरु झाली किंवा शाळेसाठी काय, काय करता येईल वगैरे अशा विषयांवर ते दोघे बोलायला लागले की एका बाजूला तिची धुसफूस, बडबड सुरु व्हायची. बाहेरून पाहणाऱ्याला ती एक कजाग, खाष्ट बाई वाटत असेल पण खरं तर ती तशी अजिबात नव्हती. तिने तिच्या मुलीसाठी बघितलेली स्वप्नं आणि ती सत्यात आणण्यासाठी तिची चाललेली धडपड ह्यात तिची जी तगमग होत होती त्यातून तिचा असा स्वभाव निर्माण झाला होता.
कटनीमधेच विष्णू मंदिराच्या जवळ अम्माच्या वडिलांचं घर होतं. ते गेल्यावर तिच्या आणि तिच्या भावाचा म्हणजे कोमलच्या मामांचा, प्रजापती, त्यांचा सारखा हक्क होता त्या घरावर. तिच्या आईला तिच्या वाटणीचे पैसे घेऊन त्यावरचा हक्क सोडायचा होता, त्या पैशांमुळे कोमलला परदेशी पाठवायला थोडीफार मदत झाली असती. पण कोमलची मामी फार खाष्ट बाई, तिने असे एकरकमी पैसे द्यायला तर नकार दिलाच पण ते घर विकून त्याचे पैसे निम्मे वाटून घायलाही ती तयार नव्हती. त्या पैशांसाठी स्वतःच्या भावाच्या विरुद्ध कोर्टात जायला काही तिचं मन तयार झालं नाही.
त्या घराचं नाव ‘प्रजापती निवास‘. कोमलचे मामा दुसऱ्या गावाला राहायला गेले आणि प्रजापती निवास अगदी पोरकच झालं. कोमलचा मात्र ह्या घरावर खूप जीव होता. लहानपणी आजोबांचा थोडाफार सहवास ह्याच घरात लाभला होता तिला. मामी कशीही असली तरी मामा मात्र फार लाड करायचे तिचे. घरावरून ही वादावादी सुरु झाली त्याच्या आधी कोमल खूप वेळा त्यांच्याकडे राहायला जायची. नंतर ती भांडणं झाली, मामाही दुसऱ्या गावाला निघून गेले. घराच्या वाटणीची भांडणं तशीच चालू राहिली पण ते घर मात्र रिकामं झालं. कोमल बरेच वेळा जायची तिथे. कधी आम्ही दोघी तर कधी ती एकटीच. रिकाम्या घरात जाऊन काय करणार खरं तर, मला तर कंटाळाच यायचा. पण मी तिला सोबत म्हणून जायचे. बरेच वेळा सुट्टीच्या दिवशी सकाळी जाऊन आम्ही पूर्ण दिवस काढायचो तिकडे. देवळात जायचो, मागच्या टेकडीवर जायचो, कायम लक्षात राहतील असे फार छान दिवस होते ते.
—————————————————
“एक मिनिट, सॉरी तुला मधेच थांबवतेय. तू आत्ता म्हणालीस की कोमलचा फार जीव होता त्या घरावर. पण कोमलची डायरी वाचून आम्ही…म्हणजे आम्ही थोडाफार अर्थ लावत, ओळी जुळवत जी काही डायरी कळली तिची, त्यात तर ती सुजयला म्हणाली होती की त्या घरावरून चाललेल्या वादावादीमुळे मला इथे, म्हणजे त्या घरात यायला फारसं आवडत नाही म्हणून. (भाग –४० )”
“त्याचं कारण मला माहित आहे….येते मी त्या सगळ्याकडे..”
————————————————-
आमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न ठरलं जबलपूरला. आम्हाला दोघींनाही बोलावलं होतं. पण नेमकं त्याच दिवशी मी, माझ्या सगळ्या फॅमिलीबरोबर माझ्या कझिनच्या लग्नासाठी दुसऱ्या गावाला जाणार होते त्यामुळे लग्नाला काही मी येणार नव्हते. पण त्या आधी दोन दिवस मला इंदौरला जायचं होतं, माझ्या वडिलांचं काही काम करून यायचं होतं. माझे काका तिथे राहतात. मग कोमलने पण माझ्याबरोबर यायचं ठरवलं, त्यानिमित्ताने आमचं एक आउटिंग पण झालं असतं आणि काकांकडे राहणार असल्यामुळे घरातले पण लगेच तयार झाले. त्याच वेळेला कोमलचे मामाही बहिणीला काही दिवस त्यांच्याकडे येऊन राहण्यासाठी मागे लागले होते..तिच्या मामीच्या खाष्ट स्वभावामुळे अम्माला जायची इच्छा होतं नव्हती खरं तर. पण कोमलनेच आग्रह करून पंधरा दिवसांसाठी तिला जाण्यासाठी तयार केलं.
दोन दिवस आम्ही इंदौरला खूप फिरलो, मजा केली. नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी कोमल जबलपूरला जाणार होती आणि मी कटनीला परत. तर निघायच्या आदल्या दिवशी रात्री आम्ही सराफा बझारला गेलो. तिथे आम्हाला सुजय भेटला. भेटला म्हणजे भेटला असा नाही पण त्याची दहीवड्याची प्लेट माझ्या अंगावर सांडली म्हणून भांडण झालं आमचं, म्हणजे माझं. कोमल मला मागे खेचत होती, जाऊदे, चुकून झालं वगैरे मला समजावत होती. पण कोणाची प्लेट माझ्या अंगावर सांडली हे बघायला मी वर बघितलं, सुजय दिसला आणि का, कुणास ठाऊक, पुढच्याच क्षणी माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. त्या गर्दीत कुणाच्याही हातातून प्लेट निसटू शकते हे मला अर्थातच कळत होतं आणि माझा असा उगीच आरडा–ओरडा करायचा स्वभाव नाही पण सुजयला बघून एवढा राग का आला माझं मलाच अजून माहित नाही. कदाचित त्याच्यामुळे पुढे जे काही घडणार होतं त्याची चाहूल लागली असेल माझ्या मनाला…
त्यानंतर मी कटनीला परत गेले आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या कझिनच्या लग्नासाठी गेलो. दोन दिवसांनी रात्री मी कोमलला फोन केला. इकडचं–तिकडचं बोलून झाल्यावर तिने सुजय तिला लग्नात भेटल्याचं सांगितलं. त्या मुलाचं नाव सुजय आहे हे मला तिच्याकडून फोनवर कळलं. त्यानंतर तिने जे सांगितलं त्यावरून मला त्याच्यावर संशयच आला. ती म्हणाली की तो त्याच्या मित्राला भेटायला योगायोगाने कटनीलाच आला आणि योगायोगानेच मला भेटला. मग ते लायब्ररीमध्ये गेले, खूप गप्पा मारल्या. चांगला मुलगा आहे असं म्हणत होती. मी फोनवर खूप समजावलं तिला. असं एकदम अनोळखी मुलाशी ओळख वाढवणं चांगलं नाही, तो तुला ज्या प्रकारे भेटला त्यावरून तो योगायोग वाटत नाही, तो नक्कीच तुझ्या मागे कटनीला आलाय, वगैरे, असं …माझ्यापरीने मी खूप समजावलं तिला. तिला माझं बोलणं पटलं असं मला तेव्हा वाटलं.
खरं तर मी दुसऱ्याच दिवशी परत येणार होते पण तिकडे माझ्याच लग्नाची बोलणी सुरु झाली, माझ्यासाठी एक चांगलं स्थळ कोणीतरी माझ्या आई–बाबांना सुचवलं. मग तिकडे जायचं आणि त्या मुलाला भेटायचं असं प्लॅनिंग सुरु झालं. मला अर्थातच ते मान्य नव्हतं, एवढ्या लवकर लग्न करायचंच नव्हतं मला. पण मी कोमलशी फोनवर बोलले, तिने मला सुचवलं, नुसतं जाऊन तर ये, डिसिजन तर तुझाच असणार आहे. तिने सांगितलं आणि मला ते पटलं. तिच्या सांगण्यावरच मी तिकडे गेले असं म्हटलं तरी चालेल…ह्या एका गोष्टीसाठी मी देवाचे आभार मानू की नशिबाला दोष देऊ हेच कळत नाही मला. …
—————————————————–
एवढं बोलून ती थांबली आणि तिने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. शेवटचं वाक्य तोंडातून बाहेर पडताक्षणी तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या त्या तिने हाताच्या बोटाने टिपून घेतल्या. सायली आणि ईशाने एकमेकींकडे बघितलं. कोमलची स्टोरी ऐकताना तिच्या आणखी जवळ गेल्यासारखं वाटत होतं. अर्थात छू आत्ता जे बोलत होती ते डायरीत त्यांनी वाचलं होतंच. पण तिच्या घरची बॅकग्राऊंड, तिच्या आई–वडिलांचे स्वभाव, तिचा स्वभाव हे सगळं ऐकल्यावर ती आता जास्त समजायला लागली होती. छू चं शेवटचं वाक्य ऐकून मात्र सगळेच संभ्रमात पडले होते.
“म्हणजे? देवाचे आभार की नशिबाला दोष असं का म्हणालीस तू?” ईशा
थोडंसं खिन्न होत पण मग मोठ्या प्रयत्नांनी चेहऱ्यावर हसू आणत शेजारी बसलेल्या त्या मुलाच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली,
“कोमलचं ऐकून मी त्या मुलाला भेटायला गेले आणि मला माझा आयुष्याचा जोडीदार सापडला.जो आजही माझी साथ देत इथे आला आहे, अर्जुन. त्याबद्दल देवाचे आभार. पण पुढचे काही दिवस मी कोमलबरोबर नसल्यामुळे पुढे तिची जी फरफट झाली, त्याबद्दल नशिबाला दोष. माझ्या मैत्रिणीने मला माझा लाईफ–पार्टनर मिळवून दिला पण ती बिचारी एकटी पडली. त्या काही दिवसात जर मी तिथे तिच्याबरोबर असले असते तर सुजयला मी तिच्यापर्यंत येऊच दिलं नसतं. त्या दिवसांमध्येच ती सुजयला परत परत भेटली, त्याच्याकडे इतकी ओढली गेली की मी आणि तिची अम्मा तिथे नसतानाही, तिने निर्णय घेतला, त्याच्याशी लग्न करण्याचा.”
————————————————–
तिच्याशी फोनवर बोलले त्या दिवसापासून बरोबर नवव्या दिवशी मी कटनीला परत गेले, अर्जुनशी एंगेजमेंट करून. त्याला भेटायला गेले तेव्हा लग्नासाठी अजिबातच तयार नव्हते मी, त्याला भेटायलाही मनातून तयार नव्हतेच खरं तर. पण त्याला भेटले. आम्ही बोललो, आणि माझ्याही नकळत लग्न न करण्याचा निर्णय मी कधी बदलला हे मलाच कळलं नाही. मला तो मुलगा आवडलाय हे सांगायला कोमलला फोन केला मी, तिचाही विचार घ्यायला.आमची दोघींची आयुष्य किती सेम ट्रॅक्स वर चालली होती तेव्हा… कोमलशी फोनवर मी बोलले तेव्हा मला हे जाणवलं, ती त्या सुजयबद्दल बरंच काही बोलत होती. ते कुठेसे फिरायला गेले होते, आय थिंक विष्णू मंदिराच्या इथे, आणि बरंच काही सांगत होती. ती इतकी त्याच्याच बद्दल बोलत होती की ती बहुतेक विसरूनच गेली होती मी आज त्याला मुलाला भेटायला जाणार होते ते. मला त्याबद्दल काहीच विचारलं नाही तिने. कुठेतरी दुखावल्यासारखं झालं मला, आणि त्यासाठी त्या सुजयचा अजूनच राग आला. माझ्या जिवलग मैत्रिणीला हा येऊन माझ्यापासून तोडणार की काय असले विचार यायला लागले मनात. मी एवढं सांगूनही कोमल त्याला भेटत होती म्हणून तिला चांगलंच फैलावर घेतलं मी फोनवर. ..त्या सगळ्यात मला अर्जुन आवडलाय आणि घरी आमच्या एंगेजमेंटची बोलणी सुरु झाली आहेत हे मी सांगितलंच नाही तिला..खरं तर तिच्या तोंडून त्या सुजयचं नाव ऐकून माझा मूड ऑफच झाला होता.
त्या रात्री शांत झोपूच नाही शकले मी. कोमल आणि मी, दोघीही कधी नव्हे ते एवढ्या दूर आलेलो एकमेकींपासून. मग मी थोडं शांत होऊन विचार केला, अर्जुन भेटल्यावर पहिल्याच भेटीत मला त्याच्याबद्दल जे जाणवलं तेच कोमलला त्या सुजयबद्दल वाटूच शकतं. पण त्यातही एक फरक होता. मी माझ्या आई–वडिलांच्या बरोबर जाऊन त्याला भेटले होते, माझ्या घरातल्या सगळ्यांना तो आवडला होता, त्याच्याबद्दल खात्री होती. कोमलच्या बाबतीत तसं नव्हतं. ती तिथे एकटी होती, ना तिची अम्मा तिथे होती, ना मी. आधीच त्या सुजयबद्दल माझ्या मनात अढी होती. कारण मलाही माहित नव्हतं, पण तो मला आवडला नव्हता हे खरं.
मला कोमलची काळजी वाटायला लागली. पण ती वाहवत जाणारी नव्हतीच तशीही. आणि मी चारेक दिवसात परत जाणारच होते. खरं तर लगेच दुसऱ्या दिवशीच जाणार होते. पण अर्जुनच्या घरच्यांनी एक प्रस्ताव पुढे केला आणि माझ्या घरच्यांना नाही म्हणता नाही आलं. अर्जुनची आजी तिथून थोडं दूर एका लहान गावात राहायची. अंथरुणावरच होती, त्याच्या घरच्यांनी सुचवलं की त्याच्या आजीच्या गावाला जाऊन त्यांना भेटायचं आणि त्यांच्याच समोर आमचा साखरपुडा करायचा. मला कोमलला न घेता काहीही करायचं नव्हतं, तिला मी मला तो मुलगा आवडल्याचं सुद्धा काहीही सांगितलं नव्हतं. मी तसं माझ्या आई–वडिलांना सांगून बघितलं पण ते त्याच्या घरच्यांना नाही म्हणू शकले नाहीत, तसं नाही म्हणण्यासारखंसुद्धा काही नव्हतंच. ह्यात झालं काय की माझं कटनीला परत येणं आणखी दोन दिवस लांबलं. बरं, ते आजीचं गाव इतकं लहान होतं, त्यात अगदी दरीत वसलेलं होतं, तिथे मोबाईलला रेंजच यायची नाही, आजीच्या घरातला फोन बंद पडलेला. पब्लिक फोनवरच काय तो फोन होऊ शकत होता. कोमलला फोन करायची मला संधीच मिळाली नाही. दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी ठरवलं, आता कोमलला फोन करायचाच नाही…एकदम जाऊन, आपल्या साखरपुड्याची न्यूज द्यायची आणि सरप्राईझ द्यायचं असं मी ठरवलं. कधी एकदा कोमलला भेटते असं मला झालं होतं. तिच्याशी इतक्या गप्पा मारायच्या होत्या, अर्जुनबद्दल तिला सांगायचं होतं. घरी पोहोचल्यावर बॅग्स घरात टाकून मी तिच्या घराकडे अक्षरशः धावत सुटले.
पण तिच्या घराला कुलूप होतं. तिला अचानक जाऊन सरप्राईझ द्यायचं आणि साखरपुडा झाल्याचं तिला सांगून आणखी एक सरप्राईझ देऊन तिचा राग घालवायचा असं मी मनात ठरवलं होतं…पण पुढे सगळे आश्चर्याचे धक्के तिच्याकडून मला मिळणार होते हे मला तेव्हा माहित नव्हतं.
फोन हातात घेऊन तिला फोन करायचा विचार केला पण मग नंतर लक्षात आलं, तिला सरप्राईझ द्यायचंय, उगीच फोन नकोच करायला. ती कुठे गेली असेल ह्याचा विचार करत मी परत जायला मागे वळले….
क्रमशः
खुप छान . पुढचा भाग टाकायला वेळ लावू नका . उत्सुकता वाढली आहे आता .
LikeLike
Very nice…. Enthusiastic to know what happen in next part. Please post next part as soon as possible. Thank you dear for lovely part.
LikeLike