अज्ञाताची चाहूल : (भाग : 48)

“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ आली आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत…प्लिज सगळं सांगूया त्यांना….येताना कोमलच्या फोटोशी तुला बोलताना आणि मग फोटो पर्समध्ये टाकताना बघितलंय मी…ती सुद्धा वाट बघतेय छू.”

“कोमलचा फोटो? म्हणजे?”

—————————आता पुढे ———————-

 

सायलीच्या आवाजात कंप होता. हृदयाचे ठोके जलद पडायला लागलेकोमलच्या बाबतीत काय घडलं असेल ह्याची शक्यता तिचा मेंदू वर्तवत होता पण मन मात्र ते स्वीकारायला तयार नव्हतं. गेल्या काही दिवसात ती आणि ईशा मनानेच कोमलच्या खूप जवळ पोहोचले होते. आधी तिच्या डायरीतून तिला जाणून घेताना आणि नंतर छूकडून तिच्याबद्दल ऐकताना त्या स्वतःला नकळत छूच्या जागी ठेवत होत्याकोमलच्या प्रत्येक पावलावर तिच्या सोबत राहणारी छू

 

ईशाने येऊन सायलीच्या गळ्यात हात टाकले, तिचीही साधारण अशीच अवस्था झाली होती

 

छूच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. दोन मिनिटं तिला समजावल्यावर शेवटी अर्जुन म्हणाला,

मला नाही वाटत ती सांगू शकेलमीच सांगतो..थोडक्यातहे सगळं ऐकताना तिला किती त्रास होणार आहे मला माहित आहे, म्हणून थोडक्यात सांगतो

——————————————————————

आमच्या लग्नाच्या दिवशी सकाळी कोमल अचानक घराबाहेर पडलीछूला काहीतरी सांगायला ती आली होती पण छू माझ्याशी फोनवर बोलत होती, तिची आई त्यात तिच्या मागे लागली होती कशासाठी तरी.. ते पाहून तिने विचार बदललातिने लांबूनच तिला हात हलवत सांगितलं मी पटकन जाऊन येते म्हणूनपुन्हा एकदा खूण करून सांगितलं, मी तुला मेसेज केलायअर्ध्या तासात जाऊन येते.

 

दुसऱ्या क्षणी छू फोनवरचं बोलणं आटोपून तिच्या मागे धावली होती, पण कोमल त्याही आधी घराबाहेर पडली होतीआणि आज लग्नाच्या दिवशी काही छूला कोणीच घराबाहेर पडू दिलं नसतंलगबगीने तिने फोन चेक केला. कोमलने तिला मेसेज करून ठेवला होता.

छू..तुझ्या लग्नाचा दिवस माझ्यासाठी लकी ठरणार बघ. सुजयचा फोन आला होता. त्याने माझी माफी मागितली आणि आणि आपली स्टोरी मूव्हीमध्ये वापरणार आहेत ते सुद्धा सगळं निस्तरणार आहे तो. …आता काही टेन्शन नाही गं..स्पर्धेत पाठवता येणार नाही त्याबद्दल खूप वेळा त्याने सॉरी म्हटलं आणि लग्नाचं प्रॉमिस करून पळून गेला त्यासाठी पण. निदान आपण लिहिलेली स्टोरी तर आपली म्हणून राहीलत्याने मला बाहेर भेटायला बोलावलंय, विष्णूवराह मंदिराच्या इथे. तो कादंबरी परत देणार आहे

मागोमाग दुसरा मेसेज

छू सॉरी तुला नीट सांगता नाही आलं निघताना पण तो आल्रेडी तिकडे पोहोचलाय. आणि लग्नाच्या गडबडीत कोणाला जमणार माझ्या बरोबर यायला? तुला तर कोणीच नाही पाठवणारआले की भेटतेच तुलाचल बाय.

 

नक्की त्यांचं काय बोलणं झालं होतं आम्हाला कळलंच नाहीकोमल इतक्या आतुरतेने धावत का गेली? असं काय सांगितलं त्याने तिला? त्याने माफी मागितल्यावर तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर जागा झाला असावा, म्हणजे असा आमचा अंदाज. त्याने जे सांगितलं ते बोलून त्याने तिचा विश्वास परत मिळवला असणार. म्हणून तर तिला जाताना कोणाच्याही सोबतीची गरज वाटली नसावी….

 

छूने लगेच घरातल्या काही जणांना त्या देवळाकडे पाठवलं. पण कोमलचा पत्ता नव्हता. लग्नाची वेळ आली पण कोमल परत आलीच नाही….ती फोनही उचलत नव्हतीछू तिची वाट बघत, मनातली हुरहूर बाहेर दिसू न देता कोमलशिवायच लग्नाला उभी राहिली. तिचे डोळे मला वाचता येत होते, त्याक्षणी तिला काय वाटत होतं मला चांगलंच समजत होतं.

 

लग्न झाल्यावर बाकीचे काही कार्यक्रम पुढे ढकलून आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली….सगळेजण कोमलचा शोध घेत होतेत्या रात्री झोप अनावर होऊन छूला डुलकी लागली आणि तिला स्वप्नात कोमल दिसली, तिच्या नेहेमीच्या जागी, कादंबरीचं काम करताना, स्वप्नात तिला म्हणाली, “छू ये ना इकडेमी इथेच आहे..तुझीच वाट बघतेय…” पण चेहरा नेहेमीसारखा आनंदी नव्हता, त्रासलेला होता.

 

लगोलग आम्ही प्रजापती निवास मध्ये धाव घेतली. याआधी सुद्धा इथे बघून गेलोच होतो आम्ही. पण बाहेरून कुलूप लावलेलं असल्यामुळे आत जाऊन बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण आत्ता मात्र बाहेरून कुलूप नव्हतं, दार नुसतंच लोटून ठेवलेलं होतं… दार उघडल्यावर छू सगळ्यात पहिले आतल्या खोलीकडे धावली. कोमलची आवडती खोली.

 

(एवढं बोलून झाल्यावर अर्जुनने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतलापुढे काय बोलायचं ह्या वाक्याची तो जुळवाजुळव करत होताबोलण्याआधी एकवार त्याने छूकडे बघितलं…)

 

त्या खोलीत समोर कोमल निपचित पडली होतीपुढचं वर्णन मी नाही करू शकणारती आम्हाला सोडून गेली होती. त्याच खोलीत तिच्या हस्ताक्षरातली एक नोट सापडली….जीवनात आलेल्या अपयशाने खचून स्वतःला संपवतेय असं लिहिलं होतं. मग पुढे सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यावर आम्हाला कळलंतिच्या मृत्यूची अंदाजे वेळ होती ती घरातून बाहेर पडली त्यानंतर बरोबर एक तासाभरानंतरची. पोटात विष मिळालं होतं.

 

मग….

———————————————–

पण अर्जुनला मधेच तोडून छू जोरात ओरडली,

“तिने आत्महत्या नाही केली, मला माहित आहेती म्हणाली होती मला, कधीही आत्महत्येचा विचार करणार नाही. अम्माबाबूजींच्या संस्कारांचा असा अपमान कधीच करणार नाही असं म्हणाली होती….ती घाईघाईत गेली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपला होता मीती असं कधीच नाही करणारमाझ्या लग्नाच्या दिवशी ती असं वागेल?”

————————————–

सायलीने जाऊन तिच्या खांद्यावर थोपटलं. कोण, कुठली, दूर कोणत्यातरी शहरात राहणारी कोमलपण तिच्यासाठी आज सगळ्यांचे डोळे पाणावले होते. अर्जुनचा एक एक शब्द सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत होताकुठेतरी सगळ्यांनाच आशा वाटत होती, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आलं आणि कोमल वाचली, असं काहीसं तो म्हणेलपण दुर्दैवाने तसं झालं नव्हतं.

——————————————

त्यानंतर काही काळ आम्ही पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत होतो. पण काहीच उपयोग नाही झाला. कोमलची सुसाईड नोट सापडल्यामुळे आणि सुसाईड नसल्याचे आणखी काहीच पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे मग काहीच करण्यासारखं नव्हतंसुजयचा पत्ता आम्हाला कुठूनतरी काढता आला असता पण त्याच्या विरुद्ध काहीच पुरावा नव्हता आमच्याकडेत्यामुळे आम्ही ह्या सगळ्यात पडलो नाही. पण मनातली आशा सोडली नाही आम्ही. कधीतरी सुजयची आणि आमची गाठ पडेल आणि त्यावेळी अशी परिस्थिती असेल की सुजयला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ह्याची मनात खात्री बाळगून होतो आम्हीकोमलने तिच्या बाबुजींसारखं ‘सहज सुचलं’ म्हणून असं बरंच काही लिहून ठेवलेलं होतं. मधल्या काळात त्यातले काही निवडक लेख घेऊन आम्ही कोमलच्या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलं.

 

तर असं आहे सगळं. तुम्ही म्हणताय अम्माने तुम्हाला मदत केली, आम्हाला ते काही कळत नाही. पण असणार नक्कीच, नाहीतर पूर्वी कधीही न भेटलेलो आपण आज ह्या कारणासाठी एकत्र भेटलोच नसतो.

————————————–

एक मोठा उसासा टाकून डोळ्यातलं पाणी पुसत छू म्हणाली,

हे स्वप्नात येणं, भास होणं वगैरे मी अगदीच समजू शकतेकोमल सापडत नव्हती तेव्हाही मला ह्याची प्रचिती आली होती. तिनेच स्वप्नात येऊन सांगितलं मला ती प्रजापती निवास मध्ये आहे म्हणून. कोमलच्या मामामामींनी ह्या प्रकारानंतर प्रजापती निवासकडे ढुंकूनही बघितलं नाही. त्यांनी परस्पर ते घर विकण्याचा निर्णय घेतला. पण ज्या घरात असं सगळं घडून गेलंय त्याबद्दल विचित्र अशा बातम्या लवकर पसरतातते घर विकलंही गेलं नाही. त्यानंतर एकदोन वेळा मी तिथे गेले होते. कोमलची आठवण म्हणून तिची डायरी आणि तिचा फोटो तिथे ठेवायला गेले होते मी. त्यावेळी मला त्या खोलीत कोमल असल्याचे भास झाले होते. मी हे असं कसं होऊ शकेल असा विचारही केला नाही….कोमल ह्या माध्यमातून मला भेटू शकते, ती माझ्या जवळपास आहे असा विचार करते मी.”

तिचं बोलणं आता कुणीच हसण्यावारी नेलं नाही. प्रजापती निवासमध्ये त्या खोलीत दिसलेली ती मुलगी सिद्धार्थच्या डोळ्यांसमोर आली आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

 

थोडा वेळ कुणीच एकमेकांशी बोललं नाहीसायलीने आणि आईने सगळ्यांसाठी चहा करून आणला. चहाची गरज आता सगळ्यांनाच होती..

मला एक गोष्ट कळत नाहीये पण,” सुजयचे काका म्हणाले. “तुम्ही म्हणता कोमलची अम्मा, त्या मुलींना दिसायची ज्यांच्याशी सुजयचं लग्न ठरलंय बरोबर? पण असं का असेल? तिला काय साध्य करायचं असेल?”

 

तिच्या बाबतीत शेवटच्या क्षणी जे घडलं ते फारच दुर्दैवी होतंतिच्या मनात नक्की कसला सल राहिला असेल सांगणं कठीण आहे, पण अंदाज बांधायचा, तर त्या सुजयने जेव्हा कोमलची साथ देण्याची वेळ आली तेव्हा तिच्याकडे पाठ फिरवली ह्याचा जास्त त्रास झाला अम्मालाकादंबरीची चोरी करण्याचा प्लॅन सुद्धा तिला कळला होता पण जी गोष्ट तिलाच दोनतीन तासांपूर्वी कळली होती त्याबद्दल तिची संवेदना तितकीशी तीव्र नसणार ना? कोमलप्रमाणे जर तिनेही काही महिने, वर्षभर हे कादंबरीचं स्वप्न बघितलं असतं तर कदाचित तीसुद्धा त्याच्याशी मनाने जोडली गेली असती. पण तसं नव्हतं, त्यामुळे तिला ही गोष्ट अधिक लागली की कोमलला लग्नाच्या बाबतीत त्याने फसवलं आणि वेळ आल्यावर तिला साथ दिली नाही. त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ती मागे राहिलीकोमलच्या नशिबात जे दुःख आलं किंवा जे सुख त्याच्यामुळे येता येता राहिलं, ते त्यालाही लाभू द्यायचं नाही, कदाचित अशी सुडाची भावना असेल तिच्या मनात…. तुम्हाला काय वाटतं माई?” सायलीचे बाबा

 

बरोबर आहे, म्हणजे असावं. मला काही फारसं सखोल ज्ञान नाही ह्या विषयातलं. पण जेवढं कळतं त्यावरून वाटतं हे असंच असावं. आणि सुजय लग्नासाठी किंवा लग्न ठरल्यावर त्या मुलींना भेटला की ती भावना आणखी तीव्र होत असणार. त्याचं लग्न होऊ द्यायचं नाही हे आणि हे एवढंच त्या मागे राहिलेल्या तिच्या मनाला ठाऊक असणारत्याच्या पुढचंमागचं काही नाही कारण बाकीच्या भावना कधीच लोप पावल्या असणार. म्हणून ती त्या मुलींना भेटत राहिली, काहीतरी सांगत राहिली. सायलीप्रमाणे त्यांनी ह्याचा पाठपुरावा केला असता तर त्यांना सुद्धा कदाचित कटनीचा शोध लागला असता हो. ” माई आजी

 

म्हणजे तीच्या येण्यामागे फक्त एवढं उद्दिष्ट्य होतं की सुजयशी माझं लग्न होऊ नये? कटनीमध्ये माही नावाची मुलगी आहे तिला जाऊन भेट असं काही सांगायचं असेल का तिला?”

सायलीचा प्रश्न इतरांपेक्षा स्वतःलाच जास्त होता.

पण असं असेल तर स्वतःची मुलगी जिवंत नाही हे तिला माहिती नसेल? ” ईशा

 

ईशा, बायो, ते टीव्हीत बघतेस त्यावर जाऊ नकोस हो…..काहीही दाखवतात हो, असे आत्मे भटकत फिरतात वगैरे. अगो, असं बघअम्मा गेली तेव्हा तिच्यासमोर सुजयचं जे खरं रूप आलं त्यामुळे तिच्या मनात ती सुडाची भावना आली की नाही, मग ती सुडाची भावना फक्त जागी राहिलीअम्मा गेली म्हणजे तिचं शरीर गेलं, आत्मा, मन ह्यातल्या सगळ्या भावना विझून गेल्याजिवंत राहिली ती फक्त सुजयचं लग्न होऊ द्यायचं नाही ही सुडाची भावनानंतर तिच्या मुलीचा ह्या सगळ्यात बळी गेला त्या सगळ्याचा त्या भावनेशी काहीही संबंध नसणार, म्हणजेच आता मुलगी जिवंत नाही तर सूड कोणासाठी घ्यायचा, हा असा विचार जिवंत माणसं करू शकतात…..ह्याबाबतीत असं होणं शक्य नाही हो..सायली म्हणाली तसं तिला इतकंच सांगायचं असणारकटनीला जाऊन माही नावाच्या मुलीला भेट किंवा कटनी मधल्या माही नावाच्या मुलीला सुजयने फसवलंय असं काहीतरी आता तसं बघायला गेलं तर असं जगाच्या पाठीवरच्या कुठल्यातरी गावाचं नाव सांगून तिथल्या मुलीचं नाव सांगून आपल्याला काय सांगायचंय हे लोकांना कळणं अवघड आहे खरं तर अशक्यच ..पण हे आपल्याला कळतंय..तिला नाही ती फक्त तिच्या परीने सर्व शक्तीनिशी तिला जे करता आलं ते करत गेली माई आजी

 

सुजयने का केलं असेल हे सगळं? नक्की कसला फायदा झाला त्यालापैशांचा?” सायली.

नकळतच सगळ्यांच्या नजरा त्याच्या काकाकाकूंकडे वळल्या.

आम्हाला काहीच अंदाज येत नाहीयेत्याने त्या कटनीला जाऊन एवढे दिवे लावले ह्यातलं काही अंशी मला कळलं ते त्या प्रशांतमुळेपण त्याने त्या कादंबरीचं नक्की काय केलं असेल, हे आम्ही नाही सांगू शकत…”

 

हे शोधून काढायलाच हवंपण माझ्या अंदाजाप्रमाणे तो जो दुसरा फोन त्याला आला तो त्याच्या कोणीतरी मित्राचा होता, एक असा मित्र जो सिनेमा/ मालिकांच्या कथा पटकथा ह्याविषयी चांगलंच जाणून होता किंवा अगदी त्याच क्षेत्रात असणार तो कारण सुजयच्या बोलण्यात तुम्ही प्रोफेशनल लोकंअसं काहीतरी आलं. ” सायली

 

“पण अम्माचा ऍक्सीडेन्ट झाला त्यानंतर सुजय स्वतःहून कोमलने काहीही न कळवता तिला भेटायला गेला…तेव्हा साधारण संध्याकाळचे पाच-सहा वाजले असतील…त्यानंतर पहाटे तो परत आला, प्रशांतच्या सांगण्यावरून त्यांना मदत करायला म्हणून पण खरं तर त्याच वेळी कोमलला लग्न करणार नसल्याचं सांगून सगळं संपवायला…बरोबर? मग ह्या मधल्या वेळात त्याचं मत एवढं कसं बदललं? म्हणजे आधी तो स्वतःहून कोमलसाठी कटनीमध्ये आला, त्यानेच तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तिने आधी ‘नाही’ म्हटल्यावर तो निराश झाला होता…मग एवढं सगळं असताना एवढ्या कमी वेळात त्याने लग्नाचा निर्णय का बदलला?” ईशा

 

“सुजयच्या बाबतीत हे होऊच शकतं” त्याचे काका म्हणाले, “त्याचा स्वभाव थोडं स्वतःचच खरं करण्याचा..तो असा कुणाशी फटकून वागणार नाही की तोंडावर दुखावणार नाही, पण स्वतःच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट झालेली त्याला फारशी आवडत नाही…आमच्या घरातला एकुलता एक मुलगा तो, त्यामुळे लाडही खूप झाले त्याचे…सगळ्या गोष्टीत तो लहान, किंवा घरातलं एकमेव मूल म्हणून त्याच्या आवडी -निवडींना प्राधान्य…..त्याच्या बरोबर पाच-सहा दिवस गप्पा मारून त्या मुलीला त्याच्या स्वभावाची ही बाजू कशी कळणार? पण त्याला आधीपासून ओळखणारे लोक हे सहज सांगू शकतील….त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की तो तीच करणार पण ती करताना आजूबाजूच्या कोणाचाही विचार करणार नाही. किंवा एखाद्याला आपल्या एखाद्या कृतीने बरं वाटणार असेल तरी तो ते आवर्जून कधीच करणार नाही, अगदी ती व्यक्ती त्याची आई असली तरी चालेल..स्वतःवरच फार प्रेम त्याचं….आता ह्या बाबतीत हे असं होणं समोर सुजय असताना सहज शक्य आहे…आधी त्याला कोमल आवडली आणि त्याने सगळे प्रयत्न केले त्याच्याकडून…त्याच्या मनात तेव्हा खरंच लग्नाचा विचार असेलही…कोणत्याही मुलीच्या बाबतीत असा वावगं वागणारा नाही तो…पण मग प्रशांतने त्याला सांगितलं तेही त्याला पटलं…आणि मग त्याला कोमल आणि तिच्याशी जोडली गेलेली कुठलीच गोष्ट नकोशी झाली… आणि मग तिला काय वाटेल, तिच्यावर कोणती वेळ आली आहे ह्याचा विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवला नाही…”

 

हम्म…” सिद्धार्थ नीट विचार करत बोलत होता. “माझ्या अंदाजाप्रमाणे गोष्टी ह्या क्रमाने घडल्या असतील आधी सुजयने कोमलची कथा, म्हणजे त्यातली काहीच पानं सहज म्हणून त्या मित्राला पाठवली.तो त्या क्षेत्रातला जाणकार होता. त्या कथेचा एकूण दर्जा काय आहे, तो त्या कथेकडे कसं बघतो हे सुजयला जाणून घ्यायचं होतंकदाचित त्या वेळेला त्याच्या मनात वावगं काही नसेलही..तो फक्त कोमलची मदत करू पाहत होता.

नंतर बसच्या एक्सीडेंटचं कळल्यावर तो अम्माला आणि कोमलला भेटून आला…नंतर त्याला प्रशांतचा फोन आला. त्याच्याशी बोलल्यावर त्याला लग्नाचा निर्णय चुकल्याचं जाणवलं. दुसऱ्या दिवशी तिला भेटून सगळं सांगायचं त्याने ठरवलं. कादंबरी तिला परत द्यायची आणि आपल्या बाकीच्या मित्रांना ट्रेकला जॉईन करायचं असं त्याने ठरवलं असावं. नंतर जेव्हा कोमलने अम्माची तब्येत बिघडल्याचा फोन केला तेव्हा तो जरा तुटकच बोलला तिच्याशी….वरवर तिला हॉस्पिटलला येतो असं म्हणाला पण त्याची खरं तर ह्या सगळ्यात उगीच स्वतःला त्रास करून घ्यायची ईच्छा नव्हती..मग लगेच त्याने पुन्हा प्रशांतला फोन केला….आता काय करायचं असं विचारायला. प्रशांतने त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं कोमलला मदत करायला….सुजय हॉस्पिटलला आला खरा पण त्याने कोमलला लगेचच सगळं सांगून ह्या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची ठरवलं होतं..म्हणूनच हॉस्पिटलला असताना पुन्हा प्रशांतचा फोन आला तेव्हा त्याने त्याला स्वतःला हवं तेच करणार असल्याचं सांगितलं…लगेच त्याला त्याच्या दुसऱ्या मित्राचा फोन आला ज्याला त्याने कादंबरीची काही पानं वाचायला दिली होती. त्याच्याशी बोलताना कादंबरी कोमलला परत न देता आपल्याबरोबर मुंबईला आणायची त्याने ठरवलं. आणि म्हणूनच आधी ठरल्याप्रमाणे तो मित्रांबरोबर पुन्हा ट्रेकला न जाता मुंबईला आला.”

 

हम्म आता सगळं चित्र डोळ्यांसमोर नीट उभं राहतंय…” सायलीचे बाबा

 

छू मला सांग हे सगळं कधी झालं नक्की..म्हणजे कोमल जाऊन आता किती महिने झाले?” सायली.

अर्जुनकडे एकवार बघत छू डोळे मिटून घेत म्हणाली,

“आज वर्ष झालंय बरोबर …आमच्या लग्नालाही आणि कोमल जाऊनही…”

 

“काय? आजच? काय योगायोग आहे हा….बरोबर एक वर्षाने ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतोय आपल्याला…मला मगाशी सगळे लोकं घरी यायला लागले तेव्हाच वाटलं होतं आज काहीतरी होणार आहे नक्कीच..” ईशा

 

“म्हणजे आज तुमची पहिली ऍनिव्हर्सरी आहे …” सिद्धार्थ

 

“हो, पण हा दिवस आम्ही आयुष्यात कधीही सेलिब्रेट करू शकत नाही….कोमलने मेसेज मध्ये लिहिलं होतं, तुझ्या लग्नाचा दिवस माझ्यासाठी लकी ठरणार, पण तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला तो….हे सगळं कधीच नाही विसरता येणार…” छू

 

“आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करताना आणखी एक मोठी गोष्ट विसरतोय….कोमलला कुणी मारलं? तिला मारण्यामागे नक्की कोण आहे हे स्पष्ट नसलं तरी सुजयने तिला फोन करून बोलावलं होतं म्हटल्यावर सुजयनेच ते केलं असणार….मला असला राग येतोय ना त्या सुजयचा…का आपण त्याला सहन करतोय? सरळ जाऊन त्याची कॉलर पकडून, दोन कानाखाली लगावूया…मग बोलेल सरळ.” ईशा हाताच्या मुठी घट्ट आवळत म्हणाली.

दोन क्षण शांतताच पसरली….

समोर सुजयचे काका-काकू बसलेले होते त्यामुळे ईशाच्या ह्या प्रश्नावर कोणी काहीच बोललं नाही पण अर्थात हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत होता. ईशाला तिची चूक लक्षात आली…त्यांना किती अवघडल्यासारखं वाटत असेल हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं…काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,

 

म्हणजे सुजय दीड वर्षांपूर्वी कटनीला गेला. साधारण पंधरा दिवसात तो परत गेला. जवळपास चार महिन्यांनी ती पुढच्या वर्षी मुव्ही येणार ती जाहिरात आली. त्यानंतर एक महिन्याने कोमल …गेली. बरोबर एक वर्षांपूर्वी….आणि ह्या दरम्यान सुजयच्या आयुष्यात मात्र सगळं सुरळीत चाललं होतं…त्याचं लग्न मोडण्याशिवाय…” ईशा

 

“म्हणजे तो परत गेल्यावर साधारण चार महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं.., ते मोडलं. मग योगिताबरोबर ते ठरलं, पुन्हा मोडलं. आणि मग मी. मला एक कळत नाही, दोन वेळा लग्न मोडलं आणि तेही अशा कारणामुळेत्यावरूनच त्याला ह्या वेळी थोडी धाकधूक वाटत होती म्हणून तर मधल्या काळात तो दुसरा सुजय भेटला त्याच्या नावाचा वापर करून त्याने माझ्याशी लग्न करायचं ठरवलं, म्हणजे मला भास होतील हे त्याने गृहीत धरलं असेल, त्यामुळे मीसुद्धा लग्न मोडेन ह्याचीही कल्पना असेल. पण जर ह्या होणाऱ्या भासांमुळे त्याच्याबद्दल माहिती काढण्याची बुद्धी मला झाली तर मी ह्या सगळ्या भूतकाळापर्यंत पोहोचू नयेपण एवढं सगळं कशासाठी ? म्हणजे आईच्या इच्छेपुढे तो इतका लाचार झालाय की खोटं बोलून तिला आणि मला, माझ्या घरच्यांना फसवायला सुद्धा तो तयार झाला? नक्की आईच्या इच्छेखातर की आणखी काही कारण असेल? आणि लग्नानंतर मला सगळं कळेल ही शक्यता त्याने गृहीत धरली असेलच ना? आणि सगळं कळल्यावर मी त्याच्याबरोबर राहणार नाही हे तर कुणीही सांगू शकेल…मग लग्न करणं एवढं महत्वाचं का आहे त्याच्यासाठी? हा एवढा आटापिटा कशासाठी? ” सायली

सगळेजण विचारात पडले. खरंच होतं हे….इतके दिवस ह्या बाकीच्या धावपळीत हा मुद्दा कुणाच्याच लक्षात नाही आला.

मला वाटतं ह्याचं उत्तर मी देऊ शकेन. ” त्याचे काका म्हणाले.” म्हणजे माझा फक्त अंदाजमाझ्या दादाने म्हणजे सुजयच्या बाबांनी एक विल केलं होतं..आम्ही तसे काही अगदी गर्भश्रीमंत नाही. पण दादा जायच्या आधी खूप काळ कोर्टात अडकून राहिलेल्या जमिनीच्या एका केसचा निकाल आमच्या बाजूने लागला. विकायला काढली तर जवळपास दोनेक करोड सहज देऊन जाईल अशी जमीन. तर जमीन आम्हाला मिळाल्यावर सुजयचे डोळेच दिपले होते. जमीन विकून आपण त्या पैशांचं काय काय करू शकतो हे असं सगळं तो मित्राशी फोनवर बोलताना दादाने ऐकलं. आणि त्याने ठरवलं, काही झालं तरी सुजयच्या हातात ती जमीन सहजासहजी पडू द्यायची नाही. मला मुलबाळ कोणी नाही, मला काही त्या पैशात, जमिनीत इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ती दादाने आधी त्याच्या नावावर करून घेतली. आणि मग त्याने विल केलंत्याच्या मृत्यूनंतर सुजयचं लग्न होईपर्यंत ती जमीन त्याच्या नावावर होऊ शकत नाही. त्याच्यावर फक्त त्याच्या आईचा हक्क असेल. त्याचं लग्न होण्याआधी आपण गेलो तर तो ती जमीन विकायलाही मागेपुढे बघणार नाही आणि मित्रांच्या सल्ल्याने ते पैसे खर्च करेल अशी त्याला भीती वाटत होतीलग्न झाल्यावर मग त्याच्या संसारासाठी, मुलांसाठी ते पैसे उपयोगी होतीलअसा त्याचा विचार. कदाचित ह्या अटीपायी तो स्वतःचं लग्न होण्यासाठी धडपड करत होता. ”

 

आणि दुसरं कारण म्हणजे त्याला सायली खरंच आवडली होती

सिद्धार्थच्या या वाक्यावर सगळ्यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.

म्हणजे….मला असं म्हणायचंय की एवढी मोठी रिस्क जिच्यासाठी घेतली ती मुलगी आवडली नसती तर त्याने एवढा आटापिटा केलाच नसता.” सिद्धार्थ सायलीकडे बघायचं टाळत म्हणाला.

 

माय गॉड….खरं आहे हे सगळं…”तेवढ्यात अनिकेत त्याच्या लॅपटॉप मधून डोकं काढत म्हणाला.

 

“अनि , तू आत जा बरंइथे सगळे काहीतरी बोलतायत त्यात तसाही तुझा अभ्यास नाही होणार..” आई

 

ए आई, काहीही काय? त्या सुजयच्या बाबतीत एवढं सगळं मोठं कळलंय आणि मी आत जाऊन अभ्यास करत बसू? मी पण हेच बघत होतो इंटरनेटवर…” अनिकेत

 

आता ह्यात इंटरनेट वर बघण्यासारखं काय असणार आहे? कोमलची आत्ता कळलेली स्टोरी मिळाली की काय तुला त्याच्यावर?” ईशा त्याला चिडवण्याच्या स्वरात म्हणाली..

 

तुला काय वाटतं गं सगळं तुम्हालाच कळतं का? मला ह्यात घेतलं असतं ना तुम्ही तर हे सगळं कितीतरी आधीच कळलं असतं. ” अनिकेत वैतागलाच.

 

“अनि …तुला खरंच काही बोलायचंय का?” बाबा

 

मी तेच तर सांगतोय ना….इंटरनेट वर अपकमिंग मुव्हीज बघत होतोमागच्या आठवड्यात रिलीज होणार होता हा सिनेमा पण काही टेक्निकल गोष्टींमुळे दोन महिन्यांनी रिलीझ होईल आता असं म्हटलंय….’अग्यात की खोज में‘..नाव पण तेच आहेहे मी वाचलंय ह्या मुव्ही बद्दल आधीबरंच आधी अक्चुअली..पण हा विषय माझ्या आवडीचा नाही म्हणून मी काही एवढं लक्षात नाही ठेवलं…” अनि त्यात दिलेले डिटेल्स वाचत होता.

सायली, ईशा , सिद्धार्थ, छू सगळे त्याच्या भोवती गोळा झाले.

मोठं प्रोडक्शन हाऊस आहे…” ईशा

 

हम्म…” सायली

आता सगळेच गप्प बसले. पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत होता.

म्हणजे आता सिच्युएशन साधारण अशी आहे….” सायली सगळं नीट लक्षात ठेवत पॉझ घेत घेत बोलत होती. “कोमलची स्टोरी सुजयने आणि त्या मित्राने मिळून ह्या सिनेमाच्या लेखकाला विकली किंवा ह्या सिनेमाचा लेखक हाच तो सुजयचा मित्र असेल. आता तिच्या आणि तिच्या बाबूजींच्या मेहनतीचं फळ हे लोक चाखणार. कोमलचा आणि तिच्या अम्माचा ह्यात जीव गेला. तिला परत नाही आणता येणार पण तिच्या मेहनतीचं, कलेचं श्रेय दुसऱ्या कोणालातरी मिळण्यापासून वाचवायला हवं. त्यावर तिचं आणि बाबूजींचंच नाव लागलं पाहिजे. शिवाय ज्यासाठी त्यांनी हे स्वप्नं पाहिलं, शाळेतल्या मुलांसाठी चांगल्या सोयी वगैरे ते पूर्ण झालं पाहिजे

आणि दुसरीकडे तो सुजय, कोमलच्या हक्काचे पैसे घेऊन, वर आता मला फसवून त्यामुळे मिळणारे ती जमीन आणि ती विकून मिळणारे पैसे ह्या सगळ्याचं स्वप्नं बघत असेल..त्याला आता त्या टेलरच्या रिसिटवरून माझ्यावर संशय आलाय. योगिताकडून त्याला काही कळलं नसेलच पण तरी त्याचा संशय पूर्ण मिटला नसेलकाहीही करून त्याला जाळ्यात पकडायला हवं…कोमलला कुणी मारलं हे तोच सांगू शकतो आपल्याला ”

 

हम्म….पण काय करायचं नक्की?” सिद्धार्थ

मुलं अशी पुढचं सगळं ठरवायच्या बेतात असताना आईचं लक्ष सुजयच्या काकाकाकूंकडे गेलं. ते अवघडून बसले होतेतिने मानेनेच बाबांना खूण केली. बाबांनी एक क्षण विचार केला आणि त्यांच्या समोर जाऊन बसले.

मिस्टर साने, माफ करातुमच्या समोरच ही मुलं सुजयला शिक्षा वगैरे सगळं बोलतायत..पण ..”

 

अहो तुम्ही का माफी मागतायखरं तर आम्ही माफी मागायला हवी..हात जोडूनलाज वाटते त्याची आम्हाला..तो हट्टी आहे, स्वतःचं खरं करणारा आहे, पण त्याला पैशांचा एवढा हव्यास असेल असं वाटलं नव्हतं हो मलाखरं तर मीच खूप निष्काळजी आहे.. आधीच त्याला धारेवर धरायला हवं होतं. त्या मुलीचा जीव तरी वाचला असता. त्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि तुम्हाला लागेल ते सहकार्य करेन मीआमच्या वहिनींबद्दल फार वाईट वाटतं होफार फार साधी बाई आहे तीसुजय म्हणजे जग आहे त्यांचंकुठल्या तोंडाने हे त्यांना सांगणार कळत नाहीये…”

त्यांच्या बाजूला बसलेल्या सुजयच्या काकू डोळ्यातलं पाणी टिपत होत्यात्या दोघांना फार मोठं धक्का बसला होता हे दिसतच होतं.

शांत व्हाआपण बघू काय करायचं ते..” बाबांनी विषय जास्त वाढवला नाही.

तिकडे चर्चा करणारा दुसरा ग्रुप बसला होता. सायली, ईशा, अनि, छू, सिद्धार्थ, अर्जुन. छू आणि अर्जुन तसे गप्पच होते. त्यात बाकी सगळे मराठीत बोलत होते, ते पटकन कळत नव्हतं. पुढे काय करता येईल ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं पण समोर चाललेली सगळी चर्चा कोमलसाठी होतेय एवढं मात्र कळत होतं. आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच असं मोकळं वाटत होतं..सगळं दुःख, टेन्शन काही प्रमाणात हलकं झाल्यासारखं वाटत होतं.

ती कथा कोमलने लिहिली होती त्याचा काही प्रूफ आहे का आपल्याकडे?” सायलीने छूकडे बघत विचारलं.

(हिंदीत)

छू आणि अर्जुनने एकमेकांकडे बघितलं नाहीअशी मान हलवत.

आपल्याकडे तसं म्हटलं तर कुठलाच प्रूफ नाहीसुजय तिथे गेला होता हे त्याच्या मित्रांकडून कन्फर्म होऊ शकतं पण तिथे काय काय झालं ते बघायला त्यांच्यापैकी कुणीच तिकडे नव्हतं. ” सिद्धार्थ

ह्यावर पुन्हा सगळे विचारात पडले. पुढचे सगळे मार्ग संपल्यासारखे वाटत होते.

पोरांनो, एवढे हताश काय होताय?” इतकं वेळ गप्प राहून त्यांचं संभाषण ऐकणारी माई आजी म्हणाली. “निराश होण्यासारखं काहीच नाही ह्यात…”

 

माई आजी, काय करणार आता आपण? कोमलबद्दल कळेपर्यंत मला वाटत होतं की आपल्याला फक्त सुजयला शिक्षा करायची आहे त्याच्या खोटेपणासाठी. पण आता त्याआधीही कोमलला न्याय मिळवून द्यायचाय. आणि पुरावा नाही आपल्या हातात काही. काय करणार आपण?” सायली

 

आपल्या हातात आता काय काय आहे, असा विचार कर बायोआणि हे सगळं तुमच्याकडून निस्तरायचं नव्हतं तर मग ही छू दूरच्या कुठल्या गावातून तुझ्यापर्यंत पोहोचलीच नसती नाप्रत्येक गोष्टीमागे एक योजना असते बाळाआणि योजना असेल तर ती तडीस नेण्यासाठी काहीतरी मार्गसुद्धा असणारच नाआपल्याला फक्त तो शोधायचाय….” माई आजी

 

आय लव्ह यु माई आजी, तू किती म्हणजे किती गोड आहेस माहितीये का?” सायली माई आजीच्या गळ्यात पडत म्हणाली.

 

आणि दात काढल्यावर तोंडाचं बोळकं पसरून तू हसतेस तेव्हा तर तू आणखीनच किती क्युट दिसतेस माहितीये का?” ईशा सायलीच्या गळ्यात पडत म्हणाली.

सगळेजण हसले. माईआजीचं म्हणणं खरं होतंआता इतक्या पुढे येऊन आपल्या हातात पुरावा नाही म्हणून मागे फिरणं योग्य नव्हतं. पुन्हा सगळे विचार करायला लागले, आपल्या डोक्यातले विचार मांडायला लागले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली, माई आजीच्या बोलण्यानंतर आता आणखी निग्रहाने.

येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहेसायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोचआपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…”

क्रमशः

****************

पुढचा भाग रविवारी…

One Comment Add yours

  1. sarika devrukhkar says:

    khup khup maja yetey vachayla ase watate samor sagale ghadtana distey thank you so much rutusara mam khup chan mandali ahe katha tumhi

    Like

Leave a comment